राज्यात मराठी भाषेचे महत्व वाढणार केव्हा?
महाराष्ट्रात राहायचे तर मराठी यायलाच पाहिजे. नीट बोलता नाही आले, तरी मराठी समजायला तर हवेच. फळविक्रेत्याला मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणाऱ्या एका मराठी तरुणाला मुंब्रा येथे मारहाण केली जाते, माफी मागण्यास भाग पाडले जाते, एव्हढे होऊनही सरकार जागे होत नाही. मराठी संघटना याविरोधात आवाज उठवत नाहीत. नेहमीप्रमाणे यामध्ये मनसे हस्तक्षेप करून मुजोर विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडते. राज्यात मराठी भाषा रुजवण्याचे, भाषेची आवड निर्माण करण्याचे कार्य ज्याप्रकारे शिक्षण विभाग करत आहे, त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात इंग्रजी भाषेचे वाढलेले अवास्तव स्तोम कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
अथक प्रयत्नांनंतर मराठी भाषेला गतवर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. राज्यातील प्रत्येक शाळा मग ती खासगी असो, केंद्रीय असो वा अन्य भाषिक त्यामध्ये मराठी शिकवणे अनिवार्य अरण्यात आले आहे. असे असताना काही शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी राज्याच्या शिक्षण विभागाकडे आल्यावर शिक्षण मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मराठी भाषा शिकवण्यास टाळणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाची नजर असणार असल्याचे विधान केले आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून पुढील काही दिवसांत शिक्षण विभाग तो जाहीर करणार आहे. राज्यात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती योग्यच असून येणाऱ्या मराठी भाषेची किमान ओळख होण्यास त्यामुळे साहाय्य होणार आहे. राज्यात मराठी भाषा रुजवण्याचे, भाषेची आवड निर्माण करण्याचे कार्य ज्याप्रकारे शिक्षण विभाग करत आहे, त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात इंग्रजी भाषेचे वाढलेले अवास्तव स्तोम कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
आज मराठी भाषेला महाराष्ट्रातच घरघर लागली आहे याचे कारण आपलाच व्यवहारातील मराठीचा वापर कमी होत चालला आहे. एकीकडे मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत, तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळांना अच्छे दिन आले आहेत. पाल्यांवर लहानपणापासून इंग्रजीची सक्ती करून आपण केवळ मराठीला डावलतो आहोत असे नव्हे, तर पाल्यांचा बौद्धिक विकासही खुंटत आहोत हे आपल्या केव्हा लक्षात येणार? जेव्हा व्यवहाराची आणि शिक्षणाची भाषा एक असते तेव्हाच त्या भाषेचे वैभव आणि त्यातील शब्दसंपदा, खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येऊन ती भाषा आपल्या भाव भावना व्यक्त करण्याचे, संवेदना जाणून घेण्याचे, विचार व्यक्त करण्याचे साधन बनते. आजमितीला चारचौघांत इंग्रजी भाषेत संभाषण साधने प्रतिष्ठेचे समजले जाते. प्रतिष्ठेची ही व्याख्या आपणच तयार केली आहे ना? आपल्याला फारसे इंग्रजी येत नाही म्हणून महाराष्ट्रात मराठी माणूस न्यूनगंड बाळगू लागला आहे. इंग्रजी भाषेत अस्खलित बोलण्यास शिकवणाऱ्या शिकवण्या जागोजागी तयार होऊ लागल्या आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठी तरुणच दिसून येतात. ही गरज कोणी निर्माण केली? शाळांमध्ये मुलांना भरती करण्याआधी त्यांच्या पालकांना इंग्रजी येते का हे पाहण्यासाठी प्रथम पालकांच्या मुलाखती घेतल्या जातात. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नव्याने नोकरीस लागणाऱ्या मराठी माणसाला आज इंग्रजी मुलाखतीला सामोरे जावे लागते. साधे सिम कार्ड घ्यायचे झाले, तरी त्याचा अर्ज इंग्रजीत भरावा लागतो. महाराष्ट्रात कुठल्याही क्षेत्रात आणि कोणत्याही संदर्भात निवेदन द्यायचे असेल किंवा अर्ज भरायचे असतील, तर त्यासाठी प्रथम पर्याय मराठीचाच असायला हवा ही सक्ती महाराष्ट्रात का केली जात नाही?
आज मॉल किंवा सुपर मार्केट या ठिकाणी ग्राहकांशी नीट संवाद साधता यावा यासाठी हिंदी आणि इंग्रजी चांगले येणाऱ्या तरुण तरुणींना नोकरीवर ठेवले जाते त्यासाठी त्यांना अधिक वेतन दिले जाते त्यामुळे अशा ठिकाणी मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. ही स्थिती कोणी निर्माण केली ? महाराष्ट्रात राहायचे तर मराठी यायलाच पाहिजे. नीट बोलता नाही आले, तरी मराठी समजायला तर हवेच. फळविक्रेत्याला मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणाऱ्या एका मराठी तरुणाला मुंब्रा येथे मारहाण केली जाते, माफी मागण्यास भाग पाडले जाते, त्याचा व्हिडीओ बनवून समजमाध्यमावर व्हायरल केला जातो, एव्हढे होऊनही सरकार जागे होत नाही. मराठी संघटना याविरोधात आवाज उठवत नाहीत. नेहमीप्रमाणे यामध्ये मनसे हस्तक्षेप करून मुजोर विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडते. सोसायटीमधील मराठी रहिवाशांना अन्य अमराठी भाषिकांकडून घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केली जाते तरी मारहाण करणाऱ्याच्या विरोधात तत्परतेने गुन्हा दाखल केला जात नाही महाराष्ट्रात मराठी भाषिकांवर अशीच दडपशाही होत असेल, माराठी भाषेची अशीच अवहेलना केली जात असेल तर मराठी माणसांनी न्याय तरी कोणाकडे मागायचा? आपल्या भाषेविषयी आपले प्रेम लोप पावत चालल्याचे हें परिणाम आहेत. आपल्या मातृभाषेला आलेल्या या अवकळेला आपण मराठी भाषिकच कारणीभूत आहोत. आपल्या मातृभाषेविषयी आपली अशीच उदासीनता राहिली, तर पुढच्या पिढीवर मातृभाषेचे संस्कार तरी कसे होतील ? आज मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. घरोघरी आई, बाबा, काका, मामा या गोड नात्यांची जागा आता मम्मा, डॅडा, आंटी, अंकलने घेतली आहे. मुलांना असे म्हणण्यास पालकांकडूनच प्रवृत्त केले जात आहे. मराठी सणांचे महत्व कमी होऊन फेब्रुवारीतील डेज' उत्साहाने साजरे होऊ लागले आहेत, नाताळात घरोघरी ख्रिसमस ट्री येऊ लागले आहेत, मराठी घरात नववर्ष गुढीपाडव्यापेक्षा एक जानेवारीला अधिक उत्साहाने साजरे होऊ लागले आहे. घरोघरी वाढदिवस हिंदू कालगणनेनुसार तिथींना नव्हे, तर इंग्रजी तारखांना साजरे होऊ लागले आहेत. मराठी भाषेला जपायचे असले तर सर्वप्रथम मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जपणे अधिक महत्वाचे आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येक मराठी माणसाने स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून करायला हवी. मराठी भाषेला अभिजात दर्जा तर मिळाला मात्र त्यानंतर राज्यात मराठी भाषा वाढवण्याचे आणि समृद्ध करण्याचे, मराठी रक्षणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत ते मात्र अद्यापही दिसून येत नाहीत. - जगन घाणेकर