विरार-भिवंडी ते अलिबाग महामार्ग रखडले काम

भिवंडी ; ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासन स्तरावरुन ‘सिडको'च्या माध्यमातून विरार-भिवंडी ते अलिबाग असा नवीन कॉरिडोर रस्ता महामार्ग तयार करण्याचे काम मंजूर झाले आहे. सदर महामार्ग समृध्दी आणि कोकण एक्स्प्रेस-वे यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याकरिता भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करणे संदर्भात शासनस्तरावर रहिवासी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, सदर मार्गाच्या कामाबाबत आणि व्यवहाराबाबत शासनाकडून गेल्या काही महिन्यापासून कोणत्याही हालचाली न झाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले असून उपविभागीय अधिकारी कार्यालयाऐवजी शासनस्तरावर या योजनेला चालना देण्याची मागणी होत आहे.

विरार-भिवंडी ते अलिबाग असा मल्टी मॉडेल कॉरिडोर  महामार्ग १२६ कि.मी. अंतराचा असून सदर महामार्ग रस्ता सुमारे ६ ते १४ पदरी असून रायगड, ठाणे आणि पालघर अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग असणार आहे. विरार-भिवंडी-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर महामार्ग भिवंडी तालुक्यातील अलीमघर, हायवे दिवा, काल्हेर, कशेळी, केवणी दिवा, खारबाव, खर्डी अशा विविध गावातून जात असल्याने या महामार्गाचा रस्ता तयार करण्यासाठी शासनस्तरावर या गावातील रहिवासी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करुन भूसंपादन करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, बाधित शेतकऱ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. तसेच रस्ते कामासंदर्भात कोणत्याही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, सदर महामार्गाचे काम सुध्दा ठप्प आहे. त्यातच आता या महामार्गात बदल होण्याची चर्चा नागरिकात होत असल्याने सदरचा महामार्ग होणार की नाही? याबाबत शेतकऱ्यांनी शंका सुध्दा उपस्थित केल्या आहेत. याची खात्री करण्यासाठी आणि व्यवहारात पूर्वीसारखे काही घोटाळे होऊ नये म्हणून बाधित शेतकरी वर्ग गेल्या काही महिन्यापासून प्रांत कार्यालयात खेटा घालीत आहेत. मुंबई महानगरातील प्रवेश नियंत्रित असा पहिलाच महामार्ग असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे. या कॉरीडोअरमध्ये ८ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग ८ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपुल, ५ टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पुल प्रस्तावित आहेत. सदर मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरु पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

या मार्गामधोमध १३६ कि.मी. लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे. तर विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर ‘एमएमआरडीए'कडून ‘एमएसआरडीसी'कडे सोपविल्याने महामंडळास तो समृध्दी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस-वे सह ‘जेएनपीटी'ला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या ‘समृध्दी महामागे'ची ‘जेएनपीटी'ला जोडणी नसल्याने ‘एमएसआरडीसी'ला ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'च्या मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर समृध्दी आणि कोकण एक्स्प्रेस-वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनच-४ बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सत्कर्म आश्रमात दोन पुस्तकांचे प्रकाशन