सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी

कल्याण : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून शहरात विविध ठिकाणी रस्ते, उड्डाणपूल यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागांव-मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'च्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्यासह आमदार रवींद्र चव्हाण आणि ‘शिवसेना'चे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे देखील यासाठी सातत्याने आग्रही होते.

कल्याण-डोंबिवली शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लावले आहे.कल्याण रिंग रोड, मोठागाव उड्डाणपुल, शहरांतर्गत ९० फुटी रस्त्यांचे बांधकाम, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डोंबिवली एमआयडीसी आणि निवासी भागात रस्त्यांची उभारणी यासह विविध रस्त्यांची कामे खासदार शिंदे यांनी पूर्णत्वास नेली आहेत. यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करणे, बैठका घेणे या माध्यमातून ते प्रयत्नशील होते.

डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहे. यामुळे ओघाने वाहनांची संख्या देखील वाढत आहे. या वाढत्या वाहन संख्येमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागू नये यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी नव्या रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागांव-मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणी केली होती. तर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार राजेश मोरे देखील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आग्रही होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ‘पीडब्ल्यूडी'च्या माध्यमातून सदर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक होणार वेगवान...

सागांव-मानपाडा रस्त्यावरील सोनारपाडा जंक्शन अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या १.५ ते २ कि.मी. अंतरावर सदर चौक असल्याने या ठिकाणी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. तसेच या ठिकाणी २ शाळा देखील असल्याने शाळेच्या वेळेत बसमुळे काही अंशी वाहतूक कोंडी देखील होते. मात्र, या पुलाच्या उभारणीमुळे शहरातील स्टार कॉलनी, एमआयडीसी विभाग, गांधीनगर या भागात जाणारी वाहने पुलाखालून जातील. तर रेल्वे स्थानकाकडे जाणारी आणि स्थानकाहून येणारी वाहने उड्डाणपुलाच्या सहाय्याने येतील. यामुळे नागरिकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त