‘वॉटर टॅक्सी'साठी बंदर विभागाने नियोजन करावे -ना. नितेश राणे

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय-बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.

वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. सदर बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ‘नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण'चे ब्रिजेश सिंघल, ‘महाराष्ट्र सागरी मंडळ'चे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

वॉटर टॅक्सी सुरु करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरु करावी. तसेच यासाठी ‘विमानतळ प्राधिकरण'ने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असे ना. नितेश राणे म्हणाले.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोटस्‌चा वापर केल्यामुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही ना. नितेश राणे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

क्लस्टर विरोधात ‘भाजपा'चा महापालिकेवर मोर्चा