भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी
भिवंडी : खड्ड्यांमुळे मागील कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने यंदाच्या पावसाळ्यातील पहिला बळी घेतला आहे.
यश राजेश मोरे (१८ रा.मडक्याचा पाडा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्युच्या बातमीनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. ३० जुलै रोजी सायंकाळी मृतदेह घरी आणला असता संतप्त नागरिकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यावर आडवी उभी करुन उत्स्फुर्त रास्ता रोको आंदोलन करीत खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार, अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.
२० जुलै रोजी मडक्याचा पाडा येथे राहणारा युवक यश मोरे आणि त्याचा मित्र यश बालाजी घुटे (१८ रा.विश्वभाती फाटा) असे दोघे सकाळी व्यायाम करण्यासाठी कवाड येथील व्यायामशाळेकडे चालले होते. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून दोघे जण खाली पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. या दोघांना ठाणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अखेर १० दिवसांच्या उपचारानंतर यश मोरे याची प्राणज्योत ३० जुलै रोजी मावळली.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असताना सायंकाळी मृतदेह घरी अंत्यसंस्कारासाठी घेऊन येताच मटक्याच्या पाडा येथे जमा झालेले कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी खड्ड्यांमुळे आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप करीत रस्त्यावर उतरुन रास्तारोको आंदोलन सुरु केले. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने भिवंडी- मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास ठप्प झाली होती. ज्याचा फटका घरी जाणाऱ्या चाकरमानी विद्यार्थ्यांना बसला होता. जोपर्यंत या अपघाती मृत्युस जबाबदार असणारे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. या आंदोलनानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे, आदि पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृत यशचे वडील राजेश मोरे यांचा पुरवणी जबाब घेऊन त्यामध्ये रस्त्याचे ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नावे गुन्ह्यांमध्ये समाविष्ट केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिली.
त्यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह घरी नेला. सदर रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाज्रुने सुमारे ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन स्थगित केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक स्थानिक पोलिसांनी सुरळीत केली.