ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; खड्डे मुक्तीसाठी उत्तम तंत्रज्ञान वापरण्याची सूचना
ठाणे : ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करुन खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
४ ऑगस्ट रोजी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
ठाणे मध्ये कोपरी, माजिवडा यासोबत घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सदर पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, आदि अधिकारी उपस्थित होते. ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'चे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांना दुरध्वनीद्वारे सूचना दिल्या.
दरम्यान, गायमुख घाटातील रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत असून या समस्येवर अजुनही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करुन ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी. रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत. त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरुन खड्डे मुक्ती करावी.
- ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य.