पावसाळापूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा
नवी मुंबई : मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होण्याचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले असून त्या अनुषंगाने पावसाळापूर्वीच्या सुरु असलेल्या कामांना गती द्यावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ. राहुल गेठे तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीत मान्सुनपूर्व कामांची विभागनिहाय सद्यस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली. मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष २४ x ७ सुरु असून या ठिकाणी १८०२२२३०९ आणि १८००२२२३० असे दोन टोल फ्री क्रमांक तसेच २७५६७०६० आणि २७५६७०६१ संपर्कध्वनी क्रमांक सुरु आहेत. सदर टोल फ्री क्रमांकांना ४ ते ५ मल्टीपल लाईन्स जोडून घ्याव्यात, जेणेकरुन सदर क्रमांक व्यस्त राहणार नाहीत आणि नागरिकांना संपर्कासाठी सतत उपलब्ध राहतील, असे निर्देश आयुक्तांनी दिले. या मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाप्रमाणेच ८ विभाग कार्यालये आणि ५ अग्निशमन केंद्रे या ठिकाणीही नियंत्रण कक्ष सुरु करावेत आणि सर्वांचे संपर्क क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक प्रमाणात प्रसिध्द करावेत, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नाले आणि गटारे सफाईच्या सुरु असलेल्या कामांना अधिक गती द्यावी. त्यामधून काढलेला गाळ लगेच उचलून घेण्यात यावा. रस्त्यावरील खोदकाम पूर्णपणे थांबविण्यात आले असून झालेल्या खोदकामांची पुनर्सुधारणा त्वरित करुन घेण्यात यावी आणि त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. विशेषत्वाने एमआयडीसी क्षेत्रात सुरु असलेल्या कामांकडेही बारकाईने लक्ष देत संबंधित कार्यकारी अभियंता यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सदर कामेही पावसाळापूर्व पुर्ण करण्यावर भर द्यावा, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी निर्देशित केले.
पावसाळा कालावधीत नागरिकांना स्थलांतरीत करावे लागल्यास आपापल्या विभागातील समाज मंदिरे तसेच निवास जागा अशा तात्पुरत्या निवारा केद्रांची पाहणी करुन नियोजित यादी तयार करुन ठेवण्यात यावी. तसेच आवश्यकता लक्षात घेऊन या निवारा केंद्रात नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करुन द्यायचा झाल्यास त्यांच्याकरिता खानपान व्यवस्थेचीही पूर्वतयारी करुन ठेवावी असे निर्देशित करण्यात आले. या सोबतच दरडप्रवण क्षेत्रामधील रहिवासी स्थलांतरीत करण्याबाबत तसेच नाल्यांमध्ये अडथळा आणणाऱ्या झोपड्या स्थलांतरीत करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही आयुवतांनी सूचित केले.
दरम्यान, पावसाळापूर्व कालावधीत सुरु असलेली वृक्ष छाटणीची कामे जलद पूर्ण करुन घेण्याबाबत उद्यान विभागास सूचित करतांनाच एपीएमसी मार्केट अंतर्गत स्वच्छता करुन घेण्यासाठी त्यांच्याशी समन्वय राखून काम करुन घ्यावे. जूनमध्ये शाळा सुरु होणार असून त्या अनुषंगाने इमारतींची आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी आणि तेथील सुविधांचीही तपासणी करावी. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पुर्तता शाळा सुरु झाल्याबरोबर करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावी. पावसाळापूर्व कामे जलद आणि काटेकोरपणे पूर्ण करुन पावसाळा कालावधीतही सर्व प्राधिकरणांशी समन्वय राखून नवी मुंबईकर नागरिकांना सुरक्षित सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सज्ज रहावे, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विभाग कार्यालयांमार्फत अतिक्रमण आणि नगररचना विभाग यांच्या माध्यमातून धोकादायक इमारतींची पाहणी करुन त्याची यादी प्रसिध्द करण्यात यावी. तसेच सी-वन कॅटेगरीतील ६६ इमारतींमधील रहिवास भविष्यात होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने बंद करण्यात यावा. धोकादायक इमारतींची यादी वेबसाईट आणि वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यात यावी. या सोबतच विभागात पाहणी करुन धोकादायक आढळणाऱ्या इमारतींमधील रहिवास थांबविण्याची कार्यवाही पुढे कोणतीही हानी होऊ नये या दृष्टीने करण्यात यावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.