कंपोस्ट पीट निर्मितीतून प्रभावी हरित मोहीम

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाच्या प्रभावी प्रयत्नांमुळे उद्यानांमधील ओल्या कचऱ्याचे उच्च प्रतीच्या सेंद्रिय खतात रुपांतरण होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणारा सदर नाविन्यपूर्ण उपक्रम शहरातील उद्यानांना अधिक हिरवेगार आणि समृध्द बनवित आहे. त्याद्वारे ‘माझी वसुंधरा अभियान'ला अधिक सक्षम बनवित आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२५ हून अधिक उद्याने आणि सुशोभित जागा यामुळे नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जात असून विविध उद्यानांमध्ये एकूण १२० कंपोस्ट खत निर्मिती केंद्रे (पिटस्‌) निर्माण करण्यात आलेली आहेत. याठिकाणी पालापाचोळा, हिरवा कचरा आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने विघटन केले जाते. या प्रक्रियेतून तयार होणारे कंपोस्ट खत उद्यानांमधील वनस्पती, झाडे-झुडपे आणि हिरवळीसाठी वरदान ठरत आहे. यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन, नैसर्गिक खत वापरास प्रोत्साहन मिळत आहे.

नैसर्गिक सेंद्रिय खत बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून त्याकरिता विटा रचून चौकोनी अथवा आयताकृती आकाराचे पिट बनविण्यात येते. या पिटमध्ये प्रथमतः थोडा मातीचा थर टाकला जातो. त्यानंतर पिटमध्ये कल्चर (बॅक्टेरियायुक्त खत) टाकण्यात येते. त्यामध्ये ओला आणि सुका पालापाचोळा, ओले गवत, फुले, फांद्या यांचे बारीक मिश्रण करुन पाण्याने भिजवून टाकले जाते. या मिश्रणावर ओले शेण मिश्रित पाणी आणि कल्चर टाकून त्याला एकत्रित करण्यात येते.

प्रत्येक दिवशी निर्माण होणारा हिरवा कचरा पिटमध्ये टाकून ओले शेणमिश्रित पाणी शिंपडून त्याला नियमितपणे काटेरी उपकरणाने ढवळले जाते. याची नियमितपणे योग्य काळजी घेतल्यास, त्यात फक्त हिरवा कचरा टाकल्यास कचऱ्याला दुर्गंधी येत नाही. साधारणतः ४५ दिवसांत चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत झाडांसाठी तयार होते. त्यासोबतच बागेतील कचरा कमी करण्याचे समाधानही मिळते. तयार झालेले खत झाडांना, हिरवळीसाठी, झाडे-झुडपे, गच्चीवरील कुंड्या आणि भाजीपाला उत्पादनासाठी वापरले जाते.

अशा पर्यावरण संवर्धनाच्या कृतीत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नवी मुंबई महापालिका नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे आवाहन करते, जेणेकरुन सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये.

त्यासोबतच प्लास्टिक किंवा तत्सम अविघटनशील कचरा ओल्या कचऱ्यात मिसळू नये, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाद्वारे सदर हरित मोहीम अधिक प्रभावी आणि यशस्वी होऊ शकते.

या कंपोस्ट पीट उपक्रमाचे उल्लेखनीय फायदे असून याद्वारे उद्यानांमधील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन होते. निसर्गरम्य आणि आरोग्यदायी उद्यानांची निर्मिती होते. रासायनिक खतांचा वापर कमी होऊन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन लाभते. कचरा व्यवस्थापनाचा खर्च

कमी होऊन एकप्रकारे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच जमिनीची गुणवत्ता सुधारुन पर्यावरणाचे संरक्षण होते. त्यामुळे सदर प्रक्रियेचा वापर करुन प्रत्येक घरी ‘हरित टोपली (ग्रीन बास्केट)' तयार करावी आणि ती उपयोगात आणावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळापूर्व नालेसफाई; ३१ मे पर्यंत डेडलाईन