मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर - राज्यपाल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक' या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांचे हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची कॉफी टेबल बुकची निर्मितीची संकल्पना अभिनंदनीय असल्याचेही राज्यपाल म्हणाले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, योगेश सागर, मंगेश चव्हाण, देवयानी फरांदे, अनुप अग्रवाल आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘जलयुक्त शिवार अभियान' योजना राबवण्यात आली, ज्यामुळे २२,००० हून अधिक गावांमध्ये जलसुरक्षा प्राप्त झाली. तसेच नागपूर-मुंबई शहरांना जोडणारा ‘समृध्दी महामार्ग' असा भविष्यकालीन दृष्टीकोन असलेला प्रकल्प साकारला गेला. महाराष्ट्राने सेवा हक्क कायदा लागू केला आहे. त्यामुळेच ‘आपले सरकार' अशी तक्रार निवारण प्रणाली आणि सेवा हक्क कायदा नागरिकांना शेकडो सेवा घरपोच देत आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, महाराष्ट्र २०१६ मध्ये देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले, जे देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या जवळपास निम्मे होते. पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्राधान्यामुळे ‘मुंबई मेट्रो'चा विस्तार प्रकल्प, अटल सेतू सागरी पुल, तसेच शासकीय-खासगी भागीदारीद्वारे शहरी आणि ग्रामीण विकासाला चालना मिळाली. राज्यात सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान आणि दुर्बल घटकांसाठी सीएसआर अंतर्गत प्रभावी उपक्रम राबवण्यात आले. महाराष्ट्रात लवकरच वाढवण मधील खोल समुद्रातील बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपान सरकारच्या सहाय्याने सुरु असलेली बुलेट ट्रेन योजना असे ३ ऐतिहासिक प्रकल्प साकारले जाणार असल्याचेही राज्यपाल राधाकृष्णन यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-दावोस मधील सहभागामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळाली, ज्यामुळे १५ लाख कोटी रुपयांहून अधिक सामंजस्य करार झाले आणि १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला. राजकीय जीवनापलीकडे ना. फडणवीस एक मूल्यप्रिय, कुटुंबवत्सल, आध्यात्मिक आणि विचारशील व्यक्तिमत्त्व आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांच्या जीवनात ‘माझी लाडकी बहिण योजना'च्या माध्यमातून १ कोटींहून अधिक महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक आणि सामाजिक बळकटी मिळत असून, सदर सन्मान, आत्मनिर्भरतेचा आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आदर्श ठरला आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मनोगत व्यवत केले. दरम्यान, कॉफीटेबल बुकमध्ये अनेक मान्यवरांच्या लक्षवेधी मुलाखती असून त्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, अभिनेते आमिर खान, अमृता फडणवीस, श्रीपाद अपराजित, मृणालिनी नानिवडेकर, यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे. या कॉफीटेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.