महाराष्ट्रात १९,२०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा -मुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई : मेडिसिटी एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, असा आहे. या ‘मेडिसिटी'मध्ये विविध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रिसर्च सेंटर्स, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि इतर आरोग्य सुविधांचा समावेश असणार आहे. या ‘मेडिसिटी'च्या निर्माणासाठी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘सिंगापूर'चे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोली मधील ‘कॅपिटालँड डेटा सेंटर'चे उद्घाटन १२ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ‘सिंगापूर'चे परिवहन मंत्री जेफरी सिओ, ‘कॅपिटालँड इंडिया ट्रस्ट'चे अध्यक्ष मनोहर खैतानी, ‘कॅपिटालँड इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ‘नागपूर'चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत नागपूर येथे ३५० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी ७०० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे रोजगाराच्या ३ हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीने नागपूरमध्ये मेडिसिटी उभारावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘स्टेट ऑफ आर्ट' अशा प्रकारच्या ‘कॅपिटालँड'च्या ‘डेटा सेंटर'चे उद्घाटन संपन्न झाले आहे. ‘टेक्नॉलॉजी व्हाईस ॲडवान्स' अशा प्रकारचे सदर डेटा सेंटर आहे. ‘डेटा सेंटर'मध्ये वेगवेगळ्या प्रकारे अतिशय चांगल्या पध्दतीच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची कार्यक्षमता वाढविण्याकरिता आपल्याला ‘डेटा सेंटर'ची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्येही ती क्षमता उभी राहणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
देशाची ६० टक्के डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे. आज महाराष्ट्र शासन आणि कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत सुमारे १९,२०० कोटींची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट आणि महाराष्ट्रातील त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच सदर करारामुळे अंदाजे रोजगाराच्या थेट ६० हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या करारांतर्गत मुंबई आणि पुणे येथे बिझनेस पार्कस्, मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स, संपूर्ण महाराष्ट्रात लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्कस् असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासोबतच मेपल ट्री सोबत ३ हजार कोटींच्या कराराद्वारे आपल्याकडे काही लॉजिस्टिक पार्कस् तयार केले जाणार आहेत. सदर ‘डेटा सेंटर' विक्रमी वेळामध्ये त्यांनी पूर्ण केले आहे.
-ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य.
नवी मुंबई भारतातील महत्वाचे डिजिटल केंद्र -उपपंतप्रधान योंग
आज नवी मुंबईमध्ये कॅपिटालँड डेटा सेंटर यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी येथे उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. नवी मुंबई भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे, आणि मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरु यांसारख्या शहरांसोबत तेे केंद्र भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करीत आहे, असे ‘सिंगापूर'चे उपपंतप्रधान गन किम योंग यांनी सांगितले.
भारतात सध्या ८०० दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम आहे. त्यामुळे, ‘डेटा सेंटर'ची मागणी पुढील काळात झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील ‘डेटा सेंटर'ची क्षमता सध्याच्या १.२ गिगा वॅटवरुन २०३० पर्यंत ४.५ गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सदर डेटा सेंटर ‘कॅपिटालँड'च्या भारतातील गुंतवणुकीचा एक भाग असल्याचा आम्हाला आनंद आहे. ‘कॅपिटालँड'ने महाराष्ट्र सरकारसोबत विविध प्रकल्पांमध्ये, जसे बिझनेस पार्कस्, लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्कस् मध्ये गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे. यामुळे कॅपिटालँड पुढील ५ वर्षांत महाराष्ट्रात २ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा (सुमारे १६,६०० कोटी रुपये) जास्त गुंतवणूक करेल, असे उपपंतप्रधान योंग म्हणले.
सदर गुंतवणुकीचे करार सिंगापूर आणि भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंध दर्शवित आहेत. तसेच भारत जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्यामुळे ‘सिंगापूर'च्या कंपन्यांसाठीही येथे अनेक संधी निर्माण होत आहेत. ‘इंडिया-सिंगापूर डिजिटल अर्थव्यवस्था' करारानुसार, दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये डिजिटल पेमेंट आणि फिनटेक क्षेत्रांत सहकार्य वाढविले जात आहे. या संधींमुळे सिंगापूर आणि भारत यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत आहेत. सदर नवीन ‘डेटा सेंटर'च्या माध्यमातून उद्योगांना, स्टार्टअप्सना आणि उद्योजकांना डिजिटल युगात नवीन संधी शोधण्यासाठी मदत करेल आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योगदान देईल, असेही योंग शेवटी म्हणाले.