कल्याण-डोंबिवली शहरात ‘स्वच्छता अभियान'चा शुभारंभ

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, सदर अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख त्या शहरातील स्वच्छतेवरुन होते. त्यामुळे अभियान कल्याण-डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून ‘स्वच्छता अभियान'मुळे दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १८ मे रोजी डोंबिवली पूर्व मधील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नामदार शिंदे बोलत होते. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. रवींद्र चव्हाण, आ. राजेश मोरे, आ. विश्वनाथ भोईर, आ. सुलभा गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ‘टाट'चे सुशीलकुमार यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

यावेळी सुमित एल्को कंपनीच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ध्वजांकन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमीपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये केडीएमसी परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप, कल्याण-टिटवाळा रिंग रोड मधील पात्र लाभार्थ्यांना, एमयुटीपी-३ कल्याण बदलापूर ३ री आणि ४ थी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच एमयुटीपी-३ कल्याण गुडस्‌ यार्ड उपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप करण्यात आले. तर टिटवाळा येथील उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबाळपाडा येथे अद्ययावत क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपुजन आणि महापालिकेच्या महिला-बालकल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ-३च्या दामिनी पथकाला १६ दुचाकी वाहन वाटप, आदि कार्यक्रम पार पडले.

स्वच्छता अभियान अंतर्गत ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'मार्फत ‘केडीएमसी'च्या ७ प्रभागातील कचरा संकलन आणि वाहतूक याचबरोबर रस्ते सफाईकरिता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करुन शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांनी सदर अभियान राबविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता. या अभियान अंतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४७ कमांड कंट्रोल सेंटर, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचे निवारण करण्याकरिता २४ तास कार्यरत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच ५ ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारणी करण्यासमवेतच प्राथमिक कचरा संकलनाकरीता पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणारी वाहने आणि चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पाकींग व्यवस्था उभारली गेेली आहे. तर कचरामुक्त रस्ता संकल्पना अंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी ३० टक्के रस्ते कचरामुक्त राहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मृत जनावरांचे अवशेष आणि हरीत कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरिता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल-दुरुस्ती करिता अत्याधुनिक सोयी-सुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर आणि रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा (कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने) आहे. अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरात कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली या दोन्हीही शहरांचा वेगाने विकास होतो आहे. येथील वाढती लोकसंख्या पाहता या शहरांची स्वच्छता ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर सदर अभियान हाती घेण्यात असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच या अभियानात कार्यरत असणाऱ्या खासगी संस्थेने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करुन घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

‘टाटा कौशल्य विकास केंद्र'च्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून त्यात रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजनस आणि ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कल्याण शहरातील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लि. संचलित कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपुजन पार पडले. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने १९७ कोटी रुपयांच्या निधीतून सदर केंद्र उभे राहणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजा-रेवस पुल बाधित प्रकल्पग्रस्तांचे १५ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण