तृतीयपंथी नागरिकांकडून स्वच्छता जनजागृती

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत असून नागरिकांचा उत्साही सहभाग सर्वच उपक्रमांमध्ये लाभताना दिसत आहे. अशाच प्रकारचा एक अभिनव स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने तृतीयपंथी नागरिकांच्या सक्रीय सहभागातून वाशी विभागात राबविण्यात आला.

या अंतर्गत वाशी विभागाचे सहा. आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ यांच्या नियंत्रणाखाली लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समित यांच्या मार्गदर्शनानुसार तृतीयपंथी नागरिकांनी सेक्टर-9 वाशी येथील फळ व भाजी मार्केटमध्ये जाऊन स्वच्छताविषयक जनजागृतीपर पत्रकांचे वाटप केले. यावेळी  व्यावसायिकांना कचरा वेगवेगळा ठेवण्याचे महत्व सांगितले व भाजी व फळांचा कचरा योग्य ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच विक्रेत्यांनी स्वत: प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच ग्राहकांनाही प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह धरावा, असेही व्यावसायिकांना सूचित करण्यात आले.

त्याचप्रमाणे काही तृतीयपंथी नागरिकांनी सेक्टर-9 व 16 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नलला थांबणाऱ्या वाहनांच्या मालक, चालकांमध्ये कचरा वर्गीकरण तसेच एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयी हातात ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचे फलक दाखवित जनजागृती केली.

वाशी विभागात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत प्लास्टिकचा वापर आढळलेल्या व्यावसायिकाकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव करणाऱ्या 3 व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला.

कोपरखैरणे विभागातील एमआयडीसी परिसरात सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने एकल वापर प्लास्टिक आढळल्याने भास्कर डेअरी यांच्याकडून दंडात्मक वसुली केली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली  संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये आबालवृध्दांसह महिलांचाही मोठया प्रमाणावर सहभाग लाभत असून तृतीयपंथी नागरिकांनीही अभियानात सहभागी होत शहर स्वच्छतेत आपले योगदान दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरमध्ये लवकरच अंतराळ संग्रहालय