राज्यातील अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी १६ स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

सदर प्रकरणातील पिडीत २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रकरणी भा.न्या.संहिता प्रमाणे ५आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी शासनाची भूमिका अत्यंत गंभीर असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकील नेमले जातील. पिडीत मुलींच्या पुढील शिक्षणाची आणि पुनर्वसनाची जबाबदारीही लक्षात घेतली असून, मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली आणि मुलांना कुठे रहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

तसेच जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये एकच पत्ता असलेली मुले आढळल्यास, त्या ठिकाणी अवैध बालिका आश्रम आहेत का? ते तपासून पाहण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पसायदान संस्थेत जिथे पिडीत मुलं राहत होते तिथे प्रत्येक मुलाचा पत्ता ‘रेल्वे स्टेशन' असा नमूद आहे,  सदर प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. सदर मुले खरेच स्टेशनवर राहत होती का? की संस्था चालकांनी मुद्दाम चुकीची माहिती दिली आहे? असा सवाल करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना या सर्व बाबींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सदर प्रकरणात प्रशासनाने तत्पर कारवाई केल्यामुळे विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाची प्रशंसा केली.

महापालिका, महिला विभागांशी समन्वय...
सदर मुद्द्यांवर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी, महिला-बालविकास विभागाच्या सुवर्णा पवार, अधिकारी संतोष भोसले तसेच समुपदेशकांशी संवाद साधून डॉ. गोऱ्हे यांनी माहिती घेतली. याच दरम्यान, उल्हासनगर मधील इतर बालिकाश्रमांची चौकशी करण्याची विनंतीही त्यांनी आयुक्तांना केली आहे.

सदर प्रकरणाच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील इतर सामाजिक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करुन येत्या महिन्यात आढावा बैठक घेणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.

मुलींच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार...
महिला-बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिडीत मुलींच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाईन बैठकांचे आयोजन करावे. त्यांच्याशी सतत संपर्कात रहावे. बालिका आश्रमातून वातावरणामुळे काही वेळेस मुली पळून जातात, त्यांना मानसिक सशक्तिकरणाची गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी मन रमेल असे सांस्कृतिक आणि सृजनशील कार्यक्रम आयोजित करा. समुपदेशक यांनी मुलांमुलींनी सांगितलेली घटना डायरीत लिहून त्याची प्रत सीडब्ल्यूसी, पोलीस आणि महिला बालविकास विभागाकडे सादर करावी. दोष सिध्दीचे प्रमाण वाढावे यासाठी बी-समरी रिपोर्टस्‌ची तपासणी आणि सक्षम वकिलांची नेमणूक गरजेची आहे. सीसीटीव्ही मॉनिटरिंग योग्य पद्धतीने केल्यास असे प्रकार टाळता येतील.
-डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती-विधान परिषद. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘डोंबिवली'च्या शिरपेचात मानाचा तुरा