विमानतळाला ‘दिबां'च्या नावाबाबत गौडबंगाल -महेंद्र घरत

उरण : प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना आधार राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही ‘दिबां'चे कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील असतो. दि. बा. पाटील यांचा संघर्ष जिवंत असेपर्यंत संपला नव्हता. आज नवी मुंबई विमानतळावरुन विमान उडण्याची वेळ आली तरी लोकनेते ‘दिबां'चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही. यात सत्ताधारी, राजकारण्यांचे काय गौडबंगाल आहे. अद्याप नावाची घोषणा न होणे, हेच नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैव आहे. त्यामुळे मुंबई, दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना परमेश्वर सुबुध्दी देवो आणि ‘दिबां'चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागो, अशी प्रार्थना केल्याची माहिती कामगार नेते तथा ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत जावळे येथे केले.

जावळे येथील मंदिरासाठी सहकार्य केल्याबद्दल जावळे ग्रामस्थांच्या वतीने महेंद्र घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात बोलताना घरत यांनी विमानतळाच्या नामकरणाबाबत खंत व्यक्त केली.

जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत ‘शेलघर'च्या जिल्हा परिषद शाळेत येत होते. ते सारे आमचे वर्ग मित्र होते. त्यामुळे निश्चित इतर गावांपेक्षा जावळे ग्रामस्थांबाबत जास्त आत्मियता आहे. त्यामुळे जावळे ग्रामस्थांसाठी मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. आज जावळे गावाला मैदान, तलाव, समाजमंदिर आदि नागरी कामांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. पण, कोणीही आमदार, खासदार असला तरीही ते फवत निवडणुकीपुरते असतात. ते मतांसाठी असतात, असेही महेंद्र घरत म्हणाले.

‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा जिथे जिथे मंदिर तिथे तिथे त्यांचा खारीचा वाटा आहेच. प्रकल्पग्रस्त आणि विमानतळबाधित गावांच्या मंदिरांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात महेंद्र घरत यांचाही सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आज स्थलांतरीत गावांची मंदिरे भव्यदिव्य होत आहेत, असे मो. का. मढवी गुरुजी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, जावळे गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार २० वर्षांपूर्वी झाला, त्यावेळीही महेंद्र घरत यांनी सढळ हस्ते मदत केली होती, शिवाय मंदिर ट्रस्ट रजिस्ट्रेशन सुध्दा स्वखर्चाने केले होते. मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असताना काही अडचणी आल्या, त्या सोडवून जावळे हनुमान मंदिराचे काम पूर्ण केले. साहजिकच दिवंगत तुकाराम कडू आणि ग्रामस्थांनी त्यावेळी महेंद्र घरत यांचा सत्कार केला होता. आज दुसऱ्या पिढीने पुन्हा एकदा घरत यांना साकडे घातले. मंदिरात पावसाळ्यात पाणी येतेय, त्यामुळे तत्काळ ५ लाख रुपये खर्च करुन महेंद्र घरत यांनी सदरचे काम पूर्ण केले, असे जावळे ग्रामस्थांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास कृष्णा कडू, अनंता घरत, रमेश घरत, अण्णा कडू, जगदीश ठाकूर, अरुण घरत आणि मोठ्या प्रमाणात जावळे ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आग्रोळी येथील समाज मंदिराची दुरवस्था