मुंबइकरांची जीवनदायिनी उरणकरांसाठी त्रासदायिनी
उरण : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उरण-नेरुळ तसेच उरण-बेलापूर लोकल सेवा १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या सेवेत सुरु झाली. उरण-नेरुळ आणि उरण-बेलापूर लोकल ट्रेन सुरु झाल्याने उरणकरांचा पनवेल, नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला. उरणचा औद्योगिक विकास झाल्याने नोकरवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिक यांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवेमुळे उरणमध्ये प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यामुळे उरणमधील प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्या १ तासाऐवजी प्रत्येक १५ मिनिटाला असावी. तसेच उरण-सीएसएमटी आणि उरण-ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी, अशी मागणी हजारो प्रवाशांच्या वतीने डॉ. नितीन दिघे यांनी केली आहे.
सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब, चाकरमानी मुंबई किंवा नवी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी घर घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उरण लोकल सेवा सुरु होण्यापूर्वी बिल्डरांच्या भुलथापांना भुलून उरण मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडस्मध्ये घरे घेतली आहेत. आज उरण मधील हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग लोकलने प्रवास करीत आहेत. परंतु, उरण-नेरुळ किंवा उरण-सीबीडी बेलापूर अशी लोकल सेवा एक-एक तासाच्या अंतराने असल्याने लोकलच्या फेऱ्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत.
याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी ५ वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा १०.३० नंतर नसल्यामुळे ते कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा रात्री कामावरुन उशीर झाल्यास प्रवाशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामावरून येण्यास उशीर झाल्यानंतर पर्याय म्हणून बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे .एक बससाठी ४-५ बसचे प्रवासी लाईनमध्ये उभे असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिला भगिनींना गर्दीतून स्वतःच्या घरी जाण्यासाठी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, असे डॉ. नितीन दिघे यांनी संबंधितांना दिलेल्या मागणी पत्रात नमू्द केले आहे.
अथक प्रयासाने उरण लोकल सेवा चालू झाली खरी; परंतु अफाट गर्दीमुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग, महिला वर्ग आपला बहुमूल्य वेळ या लोकल प्रवासामध्ये घालवत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबालाही वेळ देण्यास वेळ नाही. या भागातील विद्यार्थ्यांसाठी कॉलेज किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबई अथवा नवी मुंबईत प्रवास दररोज करावा लागतो. त्याचप्रमाणे उरण मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे. एकंदरीतच मुंबइकरांची जीवनदायिनी असणारी लोकल सेवा मात्र उरणकर प्रवाशांना त्रासदायिनी ठरत आहे.
उरणकरांसाठी लोकल फेऱ्या जास्तीत जास्त वाढून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी अजय हेगळकर तसेच त्यांचे सहकारी नरेनजी देशमुख (गव्हाणगांव), हितेश शिंगरे, स्वप्निल घाडगे ,दिनेश पवार, बाबाजी कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ रामभाऊ सारीक यांनी केली आहे. सदर मागणी संदर्भात वेगवेगळे मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून प्रवाशांच्या वतीने चव्हाण यांनी दिलेले आहे. तरी देखील रेल्वे बोर्डाला जाग आलेली नसल्याचा आरोप या सर्व प्रवासी प्रतिनिधींनी केला आहे. त्याअनुषंगाने डॉ. नितीन दिघे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घेण्याची विनंती केली आहे.