गतिमान प्रशासन अभियान मध्ये केडीएमसी द्वितीय
कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या उत्तरदायी सुलभ, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या अनुषंगाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान-स्पर्धा, सन २०२४-२५ अंतर्गत राज्यस्तरावरील थेट प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार महापालिका स्तरावरून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून शासनाच्या २६ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिकेला ६ लाखांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालये, विभाग, महापालिका, शासकीय संस्था, कर्मचारी यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते.
स्पर्धेतील ७ कार्यक्षेत्रांपैकी (कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना-व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब, सेवांची गुणवत्ता-दर्जा यामधील वाढ आणि उपक्रमांची परिणामकारता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नन्स, संसाधनांचा पर्याप्त आणि प्रभावी वापर, तंटा-तक्रार मुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी स्वरुपाच्या संकल्पना, प्रयोग, उपक्रम) ‘केडीएमसी'ने यामधील ई-गव्हर्नन्स या कार्यक्षेत्रांतर्गत अर्ज दाखल केला होता.
‘केडीएमसी'च्या परिवर्तन या प्रकल्पामुळे ई-गव्हर्नन्स विभागाच्या मायनेट-२ दोन प्रणालीद्वारे मालमत्ता करविषयक सर्व सेवा सुविधा ऑनलाईन आणि २४े७ सहजपणे उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांमध्ये ऑनलाईन सेवाबाबत पसंती आणि विश्वास निर्माण झाल्याने महापालिकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वसुलीत उल्लेखनीय वाढ झालेली आहे.
मालमत्ता कर विषयक सर्व सेवा-सुविधा ऑनलाईन २४े७ सहज उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना महापालिकेबद्दलचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२३-२४ मध्ये मालमत्ता करवसुलीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. त्यात ऑनलाईन मालमत्ता कराचा वाटा जास्त आहे.
दरम्यान, सदर पारितोषिकामुळे ‘केडीएमसी'च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.