नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज
मुंबई : मुंबई भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक'च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५' या आंतरराष्ट्रीय ‘सागरी परिषद'चे उद्घाटन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी-जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, ‘गुजरात'चे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ‘गोवा'चे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ‘ओडिशा'चे मुख्यमंत्री मोहन शरण मांझी, केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सचिव विजय कुमार, आदि मान्यवर उपस्थित होते.
‘इंडिया मेरीटाईम वीक'च्या निमित्ताने आज जगभरातील सागरी तज्ञ, उद्योगपती आणि प्रतिनिधी भारतात एकत्र आले असल्याचे सांगून ना. अमित शाह म्हणाले की, गेटवे ऑफ इंडिया आता गेटवे ऑफ द वर्ल्ड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या ‘जीडीपी'मध्ये ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. ५ हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिध्द करत आहे. सागर, सागरमाला, गतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ना. शाह म्हणाले.
देशातील ९० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. २०४७ पर्यंत भारत जागतिक सागरी नेतृत्व प्राप्त करण्याचे ध्येय आहे. वाढवण बंदर लवकरच जगातील टॉप १० बंदरांमध्ये गणले जाणार आहे. ग्रेट निकोबार आणि कोचिन बंदरात नव्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठीही सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या सागरी क्षेत्रात सहभागी होऊन आपल्या आणि भारताच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू -मुख्यमंत्री
भारत आणि महाराष्ट्राकडे विविध क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत नव्या ‘मेरीटाईम पॉवर'च्या रुपात उभा राहत आहे. महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू आहे असे सांगून या प्रवासात गुंतवणूकदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सागरी ताकदीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. मुंबई पोर्ट आणि जेएनपीए देशाच्या कंटेनर वाहतुकीत मोठी भूमिका बजावत आहेत. यात मुंबईसह, महाराष्ट्रातील बंदरांची भूमिकाही सदैव महत्वाची राहिली आहे. यातूनच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. वाढवण पोर्टचे बांधकाम सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील महत्वाच्या आणि पहिल्या १० बंदरापैकी एक असेल. वाढवणमुळे भविष्यात महाराष्ट्रासोबतच भारत मेरीटाईम शक्तीच्या रुपात उदयास येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राने नुकतीच महाराष्ट्र शिप बिल्डिंग पॉलिसी २०२५ जाहीर केली आहे. या धोरणांतर्गत जहाज बांधणीसाठी एक मजबूत इकोसिस्टम आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. जागतिक व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचे स्थान अधोरेखित असेच राहील, असेही ना. फडणवीस म्हणाले.
शांतताप्रिय देशांमध्ये गुंतवणूक वाढते. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थैर्य निर्माण झाले आहे, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे वातावरण तयार झाले आहे. सागरी क्षेत्र विकसित भारत निर्मितीतील महत्त्वाचा घटक ठरत आहे, असे ना. सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.