उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ‘एसटी'च्या स्मार्ट बसची पाहणी

मुंबई : ‘राज्य परिवहन महामंडळ'च्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय' तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे व्यक्त केला.

‘एसटी महामंडळ'च्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस'मध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी २८ मे रोजी ठाणे येथे केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ‘एसटी'चे अधिकारी उपस्थित होते.

सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘एकात्मिक सुरक्षा प्रणाली' नवीन बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पध्दती पासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली यासह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सदर उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणे शक्य होणार असून, चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे सदर प्रणाली बसविण्यात येत आहे. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून ‘एसटी'मध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे, असे कौतुकोद्‌गार उपमुख्यमंत्र्यांनी काढले.  

परिवहन महामंडळाच्या सदर ‘स्मार्ट बस'मध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच ३६० अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाईंड स्पॉट केमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात २, समोर आणि पाठीमागे प्रत्येकी १ कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्‌घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

एसटी बस स्थानकांमध्ये प्रचंड गैरसोयी डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची ८७ आगारांमध्ये पाहणी