राज्य सहकारी बँकेद्वारा वाशीत सायबर सिक्युरिटी सेंटरची उभारणी सायबर सिक्युरिटी सेंटर उभारणारी भारतातील पहिली सहकारी बँक 

सहकारी बँकांना ऑन बोर्ड होण्याचे सहकार मंत्र्यांचे आव्हान 

नवी मुंबई : भारतीय बँकिंग व वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सहकारी बँके द्वारा ५० कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करून उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वाशी येथे करण्यात आले. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली सहकार सुरक्षा या नावाने सुरू करण्यात आलेले हे सेंटर उभारणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे. 

सद्यस्थितीत वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता ठेवीदारांच्या गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी तसेच अन्य को-ऑपरेटिव्ह बँकांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने उभारलेल्या या सायबर सिक्युरिटी सेंटर सोबत ऑन बोर्ड येण्याचे आवाहन यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ,  शेकापाचे नेते जयंत पाटील, सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे , सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष व प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर व बँकिंग क्षेत्रातील अन्य मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. 

भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत, राज्य सहकारी बँकेने देशातील पहिले सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (C-SOC) स्थापन केले आहे. वाशी येथील स्वतच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे ५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून हे आधुनिक आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे . 

सायबर हल्ल्यांची वाढती तीव्रता आणि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संदर्भात राज्य सहकारी बँकेने उचललेले पाऊल महत्त्वपुर्ण ठरले असल्याचे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. यावेळी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

सायबर सिक्युरिटी केंद्राची मुख्य वैशिष्ट्ये व उद्दिष्टे:  

राज्य बँक व इतर सहकारी बँकांना ज्ञात व अज्ञात सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित फ्लॅटफॉर्म द्वारे सतत निरीक्षण व धोका ओळखून तत्काळ सतर्क करणे. सायबर हल्ल्यांचे प्रारंभीच निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. बँकांच्या सुरक्षेची मोजणी व धोरणात्मक मार्गदर्शन करणे. २४ बाय ७ बँकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणे व त्यांना संभाव्य धोक्याची वेळीच सूचना देण्याचे काम या सायबर सिक्युरिटी केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

सद्यस्थितीत या केंद्रामध्ये राज्य सरकारी बँकेचे ३५ तांत्रिक कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. भविष्यात सहकारी क्षेत्राच्या गरजेनुसार याची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. यासोबतच राज्य बँकेच्या सदस्य बँकांसाठी सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.  

राज्य सहकारी बँकेने हा प्रकल्प नफा न घेता सर्व सहकारी बँकांना व पतसंस्थांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, यामागे सहकारात सहकार हे तत्व आहे. डिजिटल बँकिंग आणि एआय युगाच्या दृष्टीने हे पाऊल संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई