ग्रामस्थांनी एकत्र काम केल्यास गावांचा विकास शक्य -ना. आदिती तटकरे
अलिबाग : ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज असे लोकायुक्त अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने सदर एक सकारात्मक पाऊल आहे. या ‘अभियान'मध्ये सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात पार पडली. यावेळी ना. तटकरे बोलत होत्या.
यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले, ‘यशदा'चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्यासह जिल्हा परिषद विभागप्रमुख, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थित होते.
ग्रामपंचायत म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान ७ घटकांवर आधारित आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत. तसेच जलसमृध्द गाव करणे, असा प्रमुख दृष्टीकोन असावा, असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
गावांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत योजना जनतेच्या दारी पोहोचतील. गांव सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल, जिल्हा सक्षम झाला तर राज्य आणि राज्य सक्षम झाले ते देश सक्षम होईल. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, सदर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले.
या अभियान अंतर्गत ७ घटकांवर काम करायच आहे. लोकाभिमुख प्रशासन तयार करायचे आहे. जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींच्या नावे सेतू केंद्र असून, जनतेला आवश्यक असलेले दाखले ग्रामपंचायत मधून मिळत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान एक हेक्टर जागेवर बांबू लागवड करण्यात येत आहे. यामधून ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न मिळेल. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिली.
ग्राम समृध्द करण्यासाठी अभियान अंतर्गत सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये एक स्पर्धा आहे. ‘अभियान'मुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येईल. सर्वांना सदर अभियान आपले वाटावे असे काम करुन यामध्ये जनतेचा सहभाग मिळवावा, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान उत्तमप्रकारे कसे राबविण्यात यावे याबाबत ‘यशदा'चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना मार्गदर्शन केले. अनेक सरपंच आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सदर अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मल्लिनाथ कलशेट्टी दिली.