अखेर मोरा बंदरातील गाळ काढण्यास सुरुवात

उरण : प्रवासी, लाँच मालक यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर बंदर विभाग तर्फे मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गाळात रुतलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोरा बंदरात मागील अनेक वर्षांपासून गाळाची समस्या ‘आ' वासुन उभी आहे. मोरा बंदरातील गाळाच्या समस्येमुळे समुद्राच्या ओहोटीमुळे ठराविक कालावधीसाठी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येते. कधीकधी चार-पाच दिवस प्रवासी वाहतूकच बंदच ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.तर कधी कधी नवख्या सारंग-ड्रायव्हरमुळे लाँचेस गाळात रुतून बसतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.परिणामी उरण-भाऊचा धक्का लाँच प्रवासी संतप्त होतात.

दोन वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरायचे अद्यापही थांबलेले नाही.    त्यामुळे मोरा बंदरात साचत असलेल्या गाळाची समस्या कायम स्वरुपी दूर करण्याची मागणी उरण-भाऊचा धक्का लाँच प्रवासी, मुंबई जलवाहतूक संस्था, लाँच मालकांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल अखेर बंदर विभाग तर्फे घेण्यात आली आहे.

मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या ४ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मोरा बंदर विभाग अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.

मोरा बंदरातील गाळाची समस्या दूर झाल्यानंतर उरण-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरुन वर्षभर प्रवास करणाऱ्या सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई जलवाहतूक संस्था पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तीन कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मोरा बंदरातील गाळाची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोरा बंदरात गाळाची समस्या निर्माण होण्यास नेमवया कोणत्या बाबी कारणीभूत ठरतात, याची माहिती घेण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. या अभ्यास गटाच्या अहवालानंतर मोरा बंदरातील गाळाची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. - प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता - मेरिटाईम बोर्ड, मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा