ऐन पावसाळ्यात कल्याण पश्चिम येथे कचरा प्रश्न गंभीर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकाने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधीची उधळण कंत्राटदारावर करण्याचा घाट घातलेल्या कल्याण, डोंबिवली शहराची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. कल्याण पश्चिमेसाठी घंटागाड्याच नसल्याने इतर प्रभागातील कचरा उचलून झाला तरच कल्याण पश्चिमेच्या बाजुचा कचरा उचलला जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. अनेक रहिवासी संकुलात २ ते ३ दिवस घंटागाड्या फिरकत नसल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्यावर कचऱ्याच्या डब्याच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, ‘केडीएमसी'च्या पोर्टलवर नागरिकांनी कचऱ्याचे फोटो आणि तक्रारींचा पाऊस पाडला आहे.
कल्याण, डोंबिवली शहरात कचऱ्याचा चेन्नई पटर्न राबवत शहर स्वच्छ आणि नीटके करण्यासाठी वर्षाला ८६ कोटी इतकी तगडी रक्कम मोजून केडीएमसी प्रशासनाने मे. एन्को प्लास्ट या कंपनीची नियुक्ती केली आहे. शहरातील ७ प्रभागातील कचरा गोळा करुन तो उचलून प्रक्रिया केंद्रापर्यत नेण्याची जबाबदारी या कंत्राटदारावर देत ‘केडीएमसी'चे कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून शहर महिन्याभरात स्वच्छ केले जाणार असल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नागरिकाच्या माथी ९०० रुपयांचे कचरा संकलन शुल्क थोपले आहे.
दरम्यान, जुन्या कंत्राटदाराने काम बंद केल्याने महापालिकेला घंटागाड्या आणि आरसी गाड्यांचा तुटवडा जाणवत असून एका प्रभागातील कचरा उचलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाड्या दुपारच्या सत्रात दुसऱ्या प्रभागातून फिरवल्या जातात. अनेकदा सकाळपासून काम करणारे कर्मचारी दुपारपर्यत कंटाळतात. यामुळे दुपारच्य सत्रात अनेक भागात गाड्या पोहोचतच नसल्याने कल्याण पश्चिमेकडील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कल्याण पश्चिमेकडील ब आणि क प्रभागात जुन्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कचरा उचलला जात होता. आता ‘केडीएमसी'च्या माध्यमातून या भागातील कचरा उचलला जात असला तरी कचरा उचलणाऱ्या गाड्या नसल्याने या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी नागरिकांना गाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे.
उंबर्डे, वाडेघर, गोदरेज यासारख्या उच्चभ्रू सोसायट्यांमधील कचरा मागील ३ दिवसापासून उचलण्यात आलेला नसल्याने सोसायट्यांच्या कचराकुंड्या रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्या असून भटक्या कुत्र्यांनी त्यातील कचरा रस्त्यावर पसरवला आहे. परिणामी, पावसामुळे कचरा कुजल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. याच कचऱ्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी शेकडो तक्रारी ‘केडीएमसी'च्या पोर्टलवर केल्यानंतर संध्याकाळी उशिरा कुंड्यांमधील कचरा उचलून नेण्यात आला. असे असले तरी रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याचा बकालपणा कायम असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्याबाबत ‘केडीएमसी'चे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वर्कशॉपला भेट दिली असता, वर्कशॉप मध्ये उभ्या केलेल्या कचऱ्याच्या गाड्या धूळ खात उभ्या असल्याचे दिसून आले. या वर्कशॉपला भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. गेल्या २ महिन्यांपासून या वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये झाडे उगवली आहेत. त्यामुळेच शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. केडीएमसी प्रशासनाच्या बेबंदशाही आणि बेफिकिरी वर्कशॉपचे काम सुरु असल्याने नाहक नागरिक भरडले जात असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे.