चिरनेरमधून जाणाऱ्या हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी
उरण : गोव्याला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग एकमेव पर्याय आहे. मात्र, लवकरच गोवा येथे जाण्यासाठी आणखी एक मार्ग आकार घेत आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक-कोंडी कमी होणार आहे. सदरचा हायस्पीड राष्ट्रीय महामार्ग उरण तालुक्यातील चिरनेर या इतिहास प्रसिध्द गावातून जाणार असून यामुळे मुंबई ,कोकण आणि पुणे येथील नागरिकांचा प्रवास देखील सुलभ होणार आहे. जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (२९.२१९कि.मी.) पर्यंत ६ लेनच्या बांधकामांसाठी केंद्र सरकारने ४,५००.६२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
जेएनपीए बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील चिरनेर सह इतर परिसरातील अनेक गावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात गोवा, पुणे या महत्त्वाच्या ठिकाणांवरुन ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी मोडीत काढण्यासाठी तसेच नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘जेएनपीए'ला जोडणाऱ्या ६ पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या मार्गाची लांबी २९ किलोमीटर असणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ४,५००.६२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. सध्या ‘जेएनपीए'वर पोहोचण्यासाठी ट्रॅफिकमुळे २ ते ३ तास लागतात. ‘जेएनपीए'ला जोडला जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात पागोटे गावापासून होणार आहे.
हायस्पीड महामार्ग अनेक महत्त्वपूर्व महामार्गांना जोडणार आहे. त्यापैकी उरण-चिरनेर हायवे, गोवा हायवे आणि पुणे एक्स्प्रेसवे यांना जोडण्यात येणार आहे. भविष्यात सदर महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर हायवे, समृद्धी एक्स्प्रेस-वे आणि नाशिक हायवेला जोडण्यात येईल. वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेला देखील जोडण्यात येईल. या महामार्गामुळे जेएनपीए, गोवा, पुणे आणि मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सदर नवीन महामार्ग ‘अटल सेतू'च्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरळीच्या सी-लिंकला जोडण्यात येईल. भविष्यात अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृध्दी एक्सप्रेस-वे आणि पडघा जवळील नाशिक महामार्गाशी (मोरबे, कर्जत, शेलू, वाघानी, बदलापूर मार्गे) जोडले जाईल. नवीन महामार्गावर १० हजारांहून अधिक वाहने ज्यामध्ये मल्टी एक्सल कंटेनर ट्रक देखील धावू शकणार आहेत.
सदरचा राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. एकंदरीत आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाना यश आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘महेश बालदी मित्र मंडळ'च्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे.