नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे
बेलापूर मतदारसंघ ३५ हजार दुबार मतदार
नवी मुंबई : नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर दुबार नावे वगळण्याची मागणी ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, ठाणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या सदोष असल्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दोन्ही विधानसभा मतदारसंघात जवळपास ७६ हजारांहून अधिक दुबार नावे आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ दुबार नावे आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३५ हजाराच्या आसपास दुबार नावे आहेत. विशेष म्हणजे ऐरोलीतही तीच नावे आणि बेलापूर मध्येही तीच नावे आहेत. म्हणजेच सकाळी एकीकडे मतदान करा आणि दुपारनंतर दुसरीकडे मतदान करा, असा प्रकार होत असल्याचा दाट संशय आहे. इतकेच नाही तर एकाच नोडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातही तीच तीच नावे २ ते ३ वेळा पहावयास मिळतात. नजरचुकीने म्हटल्यास १००-२००, फारफार तर ५००-१००० मतांचा गोंधळ होऊ शकतो. परंतु, ७६ हजार मतांपेक्षा अधिक घोळ नियोजित षडयंत्र आहे. दुबार नावे मतदारयादीत घुसवून आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याची सदर खेळी असून त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा संशय रवींद्र सावंत यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातच नाही तर नवी मुंबई महापालिकेच्या शेजारच्या मतदारसंघातही दुबार नावांचा घोळ आहे. ग्रामीण भागातील मतदारही येथील मतदारयाद्यांमध्ये घुसविण्यात आले आहेत. आम्ही याबाबत सर्व पुरावे नावानिशी सादर करीत आहोत. आपणही याप्रकरणी चौकशीचे निर्देश देवून तपास करणे आवश्यक आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत या मतदानाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. ‘निवडणूक आयोग'च्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि प्रामाणिकपणावर संशय निर्माण झाला आहे. सदर सर्वच्या सर्व दुबार मतदार नावे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर तातडीने वगळण्यात यावीत, तसे आपण संबंधितांना निर्देश देवून सुधारीत मतदारयादी उपलब्ध करुन देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
रवींद्र सावंत यांनी नवी मुंबईतील ७६ हजाराहून अधिक दुबार नावे वगळण्याची मागणी करताना निवेदन सादर केले. त्यावेळी ‘काँग्रेस'चे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, अनवर हवलदार, जिल्हा सचिव विद्या भांडेकर, उत्तम पिसाळ, प्रल्हाद गायकवाड, ‘ओबीसी सेल'चे संतोष सुतार, बाबासाहेब गायकवाड, शांताराम शेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.