कृती आराखड्यात महापालिकेची पहिल्या ६ मध्ये झेप

उल्हासनगर : महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उल्हासनगर महापालिकेने २९ महापालिकांमधून पहिल्या ६ मध्ये झेप घेतली आहे. शहराला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महापालिकेच्या अंतर्गत आणि बाह्य परिसरांचा कायापालट करुन दाखवल्याने आता महापालिकेने प्रथम ३ क्रमांकामध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे.

कृती आराखड्याच्या ‘केंद्र समिती'चे स्नेहल कुलकर्णी, डॉ. अतुल कोचर, आनंददिप गुप्ता यांनी उल्हासनगर महापालिकेला भेट देऊन सर्व्हेक्षण करीत रात्री उशिरापर्यंत आढावा घेतला आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये महापालिका अधिकाऱ्यांची केंद्राच्या समिती सोबत महापालिका सभागृहात बैठक झाली. त्यात शहरातील विकासकामे, प्रगतीपथावरील योजना आणि महापालिकेचा करण्यात आलेला कायापालट प्रोजेक्टरवर सादर केल्यावर केंद्राची टीम प्रभावित झाली आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, सहायक संचालक (नगररचना) ललित खोब्रागडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, उपायुक्त विशाखा मोटघरे, दिपाली चौगले, अनंत जवादवार, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, कर निर्धारक-संकलक निलम कदम, शहर अभियंता हनुमंत खरात आदिंसह सहायक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते.

कृती आराखडा अंतर्गत शहरात ४ शाळा आणि ५ रस्ते आदर्श करण्यात येत आहेत.सदर काम प्रगतीपथावर सुरु आहे. महापालिकेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टीम ॲप लावण्यात आल्याने त्यांची फोटोसह डिजीटल एन्ट्री होणार आहे. अभ्यागतांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपरिषद असल्यापासूनच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात आल्याने लेखा विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग आदिंच्या कार्यालयांना कॉर्पोरेट लुक मिळाला आहे. महापालिकेच्या भिंतीवर शहरातील विकास आणि ऐतिहासिक मंदिरे आदिंचे चित्र लावण्यात आल्याने येणारे नागरिक कौतुक करताना दिसत आहेत. मराठीतील दिशादर्शक फलक आणि ३०३ दालनांचे नंबर लक्षवेधक दिसू लागले आहेत. सहायक संचालक (नगररचना) ललित खोब्रागडे यांनी नगररचना विभागाचा तसेच कर निर्धारक-संकलक निलम कदम यांनी मालमत्ता कर विभागाचा प्रथमदर्शनी भाग मोठ्या बोर्डने झळकावून टाकला आहे. महापालिकेच्या चौकाला स्मार्ट लुक देण्यात आला आहे.

आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये तसेच मार्गदर्शनाखाली सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून काम केल्याचे सदर सकारात्मक पडसाद उमटले आहेत.
-किशोर गवस, अतिरिक्त आयुक्त-उल्हासनगर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्यापक जनसहभागातून सेवा हक्क दिन उत्साहात साजरा