रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा; अन्यथा जनआंदोलन

नवी मुंबईकर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी सीडको आणि मध्य रेल्वे प्रशासनाचा खासदार नरेश म्हस्के समन्वय साधणार

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयी-सुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी ‘मध्य रेल्वे'चे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन बैठक घेत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘आरएलडीए'च्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी ‘रेल्वे प्राधिकरण'ने पाठविला आहे. खासदार पदी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करीत आहे. मात्र, अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुध्दा २ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु न झाल्याबद्दल खा. नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

सदर बैठकीला ‘रेल्वे'चे डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक १० वरुन मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करीत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना खासदार म्हस्के यांनी केली.  

ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. सदर पादचारी पुल फलाट क्र.१ ते फलाट क्र.७ आणि ८ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल, ते काम तातडीने सुरु करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्र.५ ते फलाट क्र.१० ला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे, अशी सूचना खा. नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.

सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासानाचा साधणार समन्वय...
‘सिडको'ने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नव्हते, अशी दुर्दैवाची बाब खासदार म्हस्के यांच्या निदर्शनास आली. निवडून आल्यापासून सातत्याने यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे बैठकीत ‘रेल्वे'चे महाप्रबंधक धर्मवीर मिना आणि ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीद्वारे खा. नरेश म्हस्के यांनी संभाषण करुन देत चर्चा केली. येथील प्रवासी माझ्याशी सोयी-सुविधा देण्यासाठी वारंवार संपर्क करीत आहेत. मात्र, दोन्ही प्राधिकरणात समन्वय नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. यावर मार्ग न निघाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलनाचा इशारा खासदार म्हस्के यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिला. यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी या आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

दिघा रेल्वे स्थानक ते वाशी रेल्वे स्थानक दरम्यानच्या (दिघा, ऐरोली, सानपाडा) स्थानकांतील सोयी-सुविधा आणि सुधारणांसाठीही खा. नरेश म्हस्के यांनी सूचना केल्या.

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने दिघा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाईनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या (फक्त दुचाकी/तीन चाकी वाहनांसाठी) भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. सदर  भुयारी मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असून भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना ट्रॅक ओलांडावा लागत असून अपघात होत असल्याची गंभीर बाब खा. म्हस्के यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली.

दिघा रेल्वे स्थानकात छत, पंखे, दिवे आणि ध्वनिक्षेपकाची दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे तसेच दिघा, ऐरोली आणि कोपरखैरणे या स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी सुरु करणे, रबाले पश्चिम कडील तिकीट खिडकी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना खा. नरेश म्हस्के यांनी केली. तर वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामनडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे फलाट, रेल्वे कार्यालयांच्या आजुबाजुचा परिसराची सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब खासदार म्हस्के यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

स्वच्छ सर्वेक्षण ’मध्ये  स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’