कृषी विभागाला नवे बोधचिन्ह, घोषवाक्य
मुंबई : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती-समृध्द शेतकरी' या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत केले.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा मंत्री ना. माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेती परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या बोधचिन्हामधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे. कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनणार आहे. कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे, असे कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी नमूद केले.
कृषी विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये यापुढे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाणार आहे. कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य कृषी विभागाचे असून, त्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या कार्यक्रमात बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ) आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिध्दी भारतराव देसाई (परभणी) यांचा कृषी विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.