महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आपत्ती निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज
जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी सतर्कतेने काम करण्याचे निर्देश
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून २४ तास शनिवार आणि रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मंत्रालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
आपत्ती निवारण आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपध्दती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा ११० ते ११९ टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महापालिकांनी विशेष तयारी ठेवावी. राज्यातील सर्वच महापालिकांनी पलॅश पलड सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण २४९ ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गेल्या अनेक वर्षापासून आपण आपत्ती निवारणाचे काम करीत आहोत. त्यामुळे त्याच त्या आपत्ती पुन्हा येणार नाहीत यासाठी दक्ष रहावे आणि तसे नियोजन करावे. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. अशा समन्वयातून पुराचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो, अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. तसेच अशा भागातील गर्भवती महिलांना आपत्ती पूर्वीच सुरक्षित स्थळी अथवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात यावे. जेणेकरुन कोणताही अवनस्थ प्रसंग उद्भवणार नाही. राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलास द्यावेत. महापालिकेने रस्त्यांची कामे करताना लावलेले अडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
आपल्यासाठी प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. सर्व महापालिकांनी नाले सफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत. दरड प्रवण भागात डोंगरकड्यांना जाळ्या बसवाव्यात. धोकादायक ठिकाणी फलक लावावेत. पोलिसांनी अशा ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
बैठकीमध्ये सर्वच विभागांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून तयारी संदर्भातील माहिती दिली. त्यामध्ये लष्कराच्या ३८ तुकड्या तैनात असणार असल्याची माहिती लष्कराच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच चेतक आणि नौदलाचे हलिकॉप्टर सज्ज असणार आहे. नौदल आणि बीएमसी यांची हॉटलाईन असणार आहे, भारतीय हवाई दल सुध्दा सुसज्ज असून कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, ऊर्जा विभाग, मुंबई महापालिका, मुंबई पोलिस यांनीही मान्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली.
सदर बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत-पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नौदल, वायुलद, सैन्यदल, सागरी सुरक्षा दल, एनडीआरअफ, एसडीआरएफ, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अधिकारी, आदि उपस्थित होते.