मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा -आयुक्त राव
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व कामे जलदगतीने सुरु असून सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे असे नमूद करीत पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत नमूद केले. तसेच सद्यस्थितीत जी कामे सुरु आहेत, त्याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना घेवून तशा पध्दतीने कामे करावीत. तसेच मान्सून कालावधीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून, असेही निर्देश आुवत राव यांनी सर्व उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिले.
खासदार नरेश म्हस्के यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक आणि महापालिका प्रशासन यांच्यासमवेत महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनिष जोशी, शंकर पाटोळे यांच्यासह सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिंधीनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी प्रशासनाच्यावतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्यांचे निराकरण तातडीने करावेत, असे नमूद केले.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेबरोबर इतरही प्राधिकरणांचा समावेश आहे. मान्सूनपूर्व कामे शहरात सुरु असून सर्व कामे येत्या ३० मे पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व प्राधिकरणांना दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. सर्व प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम युदधपातळीवर सुरु आहे. परंतु, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे डोंगराहून वाहून आलेला गाळ नाल्यात आल्याने पुन्हा नालेसफाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. यावेळी त्या त्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नालेसफाईबरोबरच अंतर्गत गटारे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे देखील साफ केली जातील. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारे खड्डे पडणार नाही याबाबतची दक्षता घेतली असून जर खड्डा पडता तर तो तात्काळ अत्याधुनिक पध्दतीने बुजविला जाईल, असेही आयुक्त म्हणाले.
सदर बैठकीत वृक्ष छाटणीबाबतही लोकप्रतिनिधींनी चर्चा केली असता, प्रशासनाने यंदा एप्रिल पासूनच शहरातील झाडांची छाटणी सुरू केलेली आहे. परंतु, ज्या ठिकाणी अद्याप वृक्षछाटणीची कामे बाकी आहे, ती देखील ३० मे पूर्वी पूर्ण केली जातील, असे आयुक्तांनी नमूद केले. तसेच वृक्ष छाटणीनंतर जमा झालेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला दिल्या.
महापालिका कार्यक्षेत्रात एमएमआरडीए, एमएमआरडीसी, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि प्राधिकरणांच्या अखत्यारितील देखील कामे सुरु आहेत. सदर कामे ३० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहे. परंतु, पावसाळ्यात संबंधित प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडल्यास ते काम नागरिकांच्या सोईसाठी महापालिका करेल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विभागांनी संगनमताने काम करावयाचे आहे. कोणत्याही विभागाची तक्रार प्राप्त झाल्यास ती जबाबदारी एकमेकांवर न ढकलता नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात यावी.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.