आधी हिरवा आता काळा पाऊस
‘एमपीसीबी'चे कार्यालय डोंबिवली येथे करण्याची मागणी
डोंबिवली : काही वर्षापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरात हिरवा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आता चक्क २ दिवस डोंबिवली जवळील ‘एमआयडीसी'मधील काही भागात चक्क काळा पाऊस पडला. काळा पाऊस पडल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने हवेतील गुणवत्ता दर्शविणारे मशीन डोंबिवलीपासून लांब अंतरावर बसवले आहेत. तर विभागाचे कार्यालय कल्याण येथे आहे. डोंबिवलीमध्ये ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे कार्यालय का नाही? काळा पासून पडूनही एकही अधिकारी घटनास्थळी का दखल घेत नाही? याचा जाब ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने ८ एप्रिल रोजी ‘मंडळ'च्या अधिकाऱ्यांना विचारला.
२ दिवस डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये काळा पाऊस, काळ्या रंगाच्या ठिपके पडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मनसे'चे नेते माजी आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांच्या सुचनेनुसार पदाधिकारी आणि मनसैनिकांनी यासंदर्भात ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदनही दिले.
‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाअध्यक्ष सुदेश चुडणाईक, विधानसभा सचिव उदय वेळासकर, अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, शहर संघटक तकदिर काळण, हरीष पाटील, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, रवी गरुड, रक्षीत गायकर, प्रदीप चौधरी, संजय पाटील, कदम भोईर, महिला विभाग अध्यक्षा संगिता खोत तसेच इतर पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे डोंबिवली येथे कार्यालय नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी कार्यालयात बोलावून घेत त्यांना जाब विचारला. आपलं कार्यालय कल्याणमध्ये का? डोंबिवलीकरांना वाऱ्यावर सोडून पालक ठाण्याला आणि अधिकारी कल्याणला अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी का? असा जाब ‘मनसे'ने अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर पुढील २ दिवसात २४ तास उपलब्ध होतील असे अधिकारी डोंबिवलीमध्ये बसवू आणि हवेतील गुणवत्ता दर्शवणारा फलक एमआयडीसी परिसरात लावू, असे आश्वासन ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर ‘मनसे'च्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतराचे पुढे काय?
गेल्या वर्षी डोंबिवली मधील कंपनीतील स्फोट प्रकरणानंतर उद्योग मंत्री सामंत घटनास्थळी आले असता डोंबिवली जवळील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचाबाबतचा धोरणत्मक निर्णय झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यानंतर या निर्णयाचे पुढे काय झाले? असा प्रश्न यावेळी मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी उपस्थित केला.
‘डोंबिवली एमआयडीसी'मध्ये प्रदुषण मोजणारे आणखी एक मशीन...
‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाला आश्वासन देताना पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ प्रदुषण मोजणारे मशीन लावण्यात आले आहे. डोंबिवली मध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आणखी एक मशीन लावणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र प्रदुषण मंडळ असे नाव लिहा...
‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे कार्यालय कल्याण शहरात मात्र डोंबिवलीतील प्रदूषण पाहणार का? महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यात नियंत्रण असा शब्द काढून त्याऐवजी ‘महाराष्ट्र प्रदुषण मंडळ' असे लाव लिहा, असा उपहासत्मक सल्ला यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने ‘मंडळ'च्या अधिकाऱ्यांना दिला.