सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोकण विभाग सज्ज

नवी मुंबई : चालू वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका सार्व्रत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक ‘राज्य निवडणूक आयोग'च्या वतीने ‘आयोग'चे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागात पार पडली. कोकण भवन मधील समिती सभागृहात दोन सत्रांमध्ये सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी अद्यावत करणे, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस ‘राज्य निवडणूक आयोग'चे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘राज्य निवडणूक आयोग'चे विशेष कार्यकारी आधिकारी अं. गो. जाधव, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, वसई-विरार महापालिका आयुक्त एम. एम. सूर्यवंशी, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्त अनमोल सागर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (ठाणे), किशन जावळे (रायगड), इंदूराणी जाखड (पालघर), एम. देवेंदर सिंह (रत्नागिरी), अनिल पाटील (सिंधुदूर्ग) तसेच निवडणुकीशी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या ७ जिल्ह्यांमध्ये एकूण ७५ विधानसभा मतदार संघ आहेत. ७ जिल्ह्यांमधील महसूल गावांची एकूण संख्या ६५३० असून या गांवांमधील लोकसंख्या २ कोटी ८६ लाख १ हजार ४७१ आहे. कोकण विभागतील ५ जिल्ह्यांमध्ये ४५ पंचायत समित्या आहेत. त्यात ठाणे ५, पालघर ८, रायगड १५, रत्नागिरी ९ आणि सिंधुदूर्ग ८ अशा पंचायत समित्या आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या ५ जिल्ह्यांंमध्ये एकूण २७ नगरपरिषद-नगरपंचायत आहेत. त्यात ठाणे २, पालघर ४, रायगड १० रत्नागिरी ७ आणि सिंधुदूर्ग ४ अशा आहेत. कोकण विभागात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई अशा एकूण ९ महापालिका आहेत.

बैठकीदरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, निवडणुकीची तयारी सुक्ष्म नियोजनानुसार पूर्ण व्हावी. कोणत्याही प्रकारचे अडथळे, तांत्रिक अडचणी किंवा मनुष्यबळाची कमतरता वेळेवर दूर करण्यात यावी. निवडणुकीदरम्यान पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त राखणे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, या आढावा बैठकीमुळे कोकण विभागातील निवडणुकीच्या तयारीस वेग मिळाला असून, मतदारांचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सदर टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.

बैठकीत विविध मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवावा. तसेच नागरिकांनी मोठा संख्येने मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करावी आणि लोकशाही बळकट करावी.

-दिनेश वाघमारे, आयुक्त-राज्य निवडणूक आयोग.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोमध्ये हिरकणी कक्ष – मातृत्व आणि सक्षमीकरणाचा संगम