विमानतळाला ‘दिबां'चे नाव; अन्यथा उद्‌घाटनाला विरोध

भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक भूमीपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल आणि वेळकाढूपणा करत आहे. मात्र. जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येत नाही, तोपर्यंत या विमानतळाचे उद्‌घाटन होऊ देणार नाही, असा इशारा ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

१० सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सदर माहिती दिली. लोकनेते ‘दिबां'चे समाज कार्य केवळ नवी मुंबई किंवा ठाणे पालघर जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते, तर दि. बा. पाटील यांच्यामुळे देशात स्त्री भ्रूण हत्या कायदा पारीत झाला.  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन अथवा भरीव मोबदला देण्याचे कार्य देखील त्यांनी केले असून देश स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी कुळ कायदा करण्यासाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले होते. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुळ कायदा मंजूर झाला, ज्याचा फायदा आज देशातील सर्व शेतकऱ्यांना होत आहे. ओबीसी आरक्षणासाठी देखील दि. बा. पाटील यांचे मोठे योगदान आहे. दि. बा. पाटील ५ वेळा आमदार, २ वेळा खासदार, राज्याच्या ‘विधानसभा'चे विरोधी पक्षनेते असे त्यांचे राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. दिबा केवळ ठाणे, पालघर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून एक थोर समाज सुधारक म्हणूनही त्यांच्याकडे पहिले पाहिजे. त्यामुळेच नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

१४ सप्टेंबर रोजी लोकनेते दि. बा. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गांव अशी भव्य कार रॅली काढण्यात येणार असून या कार रॅलीत किमान २ हजारांहून अधिक चार चाकी गाड्या असणार आहेत. या कार रॅलीत ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, मुंबई येथून हजाराेंच्या संख्येने आगरी-कोळी बांधव उपस्थित राहणार आहेत. कार रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असणार असून तो केवळ ट्रेलर राहणार आहे. फवत आम्हाला पिच्चर दाखवायला भाग पाडू नका. जोपर्यंत विमानतळाला नाव देणार नाही तोपर्यंत विमानतळाचे उद्‌घाटन होऊ देणार नाही, असा इशारा देखील खासदार म्हात्रे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली