सिडको संपादित विस्थापित गावांना मिळणार जुनी ओळख
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर,गणेशपुरी आणि उलवे अशी गावे विस्थापित झाली. पण, त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी ‘सिडको'ने त्यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ अशी नवीन नावे दिली. परिणामी, गावांचा इतिहास आणि संस्कृती पुसून टाकली गेली. त्यामुळे या गावांना त्यांची जुनी ओळख कायम रहावी यासाठी दहा गाव समिती आणि भाजपाचे समीर मदन केणी यांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिल्यानंतर ‘सिडको'ने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.
‘सिडको'ने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवे सारख्या भागातील जमिनी संपादित केल्या. जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून २२.५ टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत, त्यांना ‘सिडको'ने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय? असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड ‘सिडको'चे असल्याने त्यांना नावेही ‘सिडको'ने दिली. काही ठिकाणी चिंचपाडावासीय ग्रामस्थ एका ठिकाणी, काही ठिकाणी कोल्ही कोपर मधील तर काही ठिकाणी वरचे ओवळे ग्रामस्थ एक भागात वसले. त्यांना ‘सिडको'ने आर-२, आर-३, करंजाडे नोड अशी नावे दिली. पण, त्यामुळे या गावांची जुनी ओळख पुसली गेली.
ग्रामस्थांनी आपल्या रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे पासबुक यावरील पत्ता जुन्या गावातीलच आहे. कोणी पत्ता विचारला तर तो पत्ता देखील ग्रामस्थांना आता नीट सांगता येत नाही, यासाठी शासन दरबारी या नव्याने वसलेल्या वसाहतींना देखील जुन्या गावांची नाडे लावण्यात यावीत, अशी मागणी नागरिक करीत होते. याबाबत समीर केणी यांनी आ. महेश बालदी यांच्याकडे चर्चा केली असता बालदी यांनी ‘सिडको'कडे पाठपुरावा सुरु केला होता. २०१७ सालापासून समीर केणी सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत होते. पण, ‘सिडको'चे अधिकारी टोलवाटोलवीचे काम करत असल्याचा आरोप केणी यांनी केला होता.
यानंतर ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक यांच्या अहवालानुसार बैठक घेण्यात आली होती. या निवेदनामध्ये त्यांनी आर१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासंबंधीत कागदपत्रावर नामांकनावर फलक उभारून देण्याबाबत विनंती केलेली होती. ‘सिडको'चे नियोजनकार आणि मुख्य अभियंता नवी मुंबई यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे कागदपत्रावर नामकरण आणि फलक उभारुन देणेबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना समीर केणी यांनी केली होती. याबाबत वडघर ग्रामपंचायतीने ठराव देखील घेतला होता. आता मात्र ‘सिडको'ला दहा गाव समिती आणि भाजपाचे पंचायत समिती अध्यक्ष समीर केणी यांनी झुकवले आहे. ‘सिडको'ने समीर केणी यांची मागणी तसेच आ.र महेश बालदी आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या पाठबळाने मान्य केली असून या गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम मिळणार आहे.
विमानतळ बाधित गावांना ओळख मिळून देण्यासाठी दहा गाव समिती आणि आम्ही पाठपुरावा केला होता. त्याला पनवेल आणि उरणच्या आमदारांनी पाठबळ दिले. त्यामुळे आता आम्हाला आमची जुनी ओळख मिळणार आहे. यामुळे आमच्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
-समीर केणी, अध्यक्ष-पंचायत समिती, वडघर विभाग, भाजपा.