बेळगावमधील मठाधिपतींचा ‘शिवसेना'मध्ये प्रवेश
ठाणे : ‘शिवसेना'चे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी ‘शिवसेना'मध्ये पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी ठाणे येथे आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.
३ ऑगस्ट रोजी प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी ‘शिवसेना'चा भगवा ध्वज हाती घेतला.
मागील ३ वर्षांपासून लोकांचा ‘शिवसेना'कडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्र साधुसंताचा आहे. मात्र, ‘महाविकास आघाडी सरकार'च्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करीत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी बाळासाहेबांचा विचार होता. मात्र, आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘उबाठा'वर केली. साधुसंतांचे आणि ‘शिवसेना'चे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.