६ माजी नगरसेवकांचा ‘शिवसेना'मध्ये प्रवेश
ठाणे : कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील ६ माजी नगरसेवकांनी ८ मे रोजी ‘शिवसेना'चे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे मध्ये शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून ‘कळवा-मुंब्रा विधानसभा'चे ‘राष्ट्रवादीे'चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका तथा ‘राषट्रवादी काँग्रेस पवार पक्ष'च्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला.
ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते ‘शिवसेना'मध्ये प्रवेश करीत आहेत. ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघेआणि ‘शिवसेना'चा गड आहे. ठाणे महापालिकेतील ७८ नगरसेवक शिवसेनासोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. ‘शिवसेना'चे काम वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस सुरु असते, याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यामुळेच ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत.