‘कल्याण'मध्ये शिंदे सेना, भाजपात जुंपली

कल्याण :  कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जोरदार जुंपली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती तोडण्याची थेट भाषा वापरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ‘भाजपा'ला ‘आडवे करु' असे थेट आव्हान दिले, तर यावर ‘भाजपा'चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ‘युती तोडा, तेव्हा कोणाची किती ताकद कळेल', असे सडेतोड प्रत्युत्तर दिले.

५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या वतीने आयोजित ‘नारी शक्ती मेळावा'मध्ये जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मोरे म्हणाले, ‘शिवसेना'चे १० बंडखोर उभे होते, त्यामुळेच तुमच्या गळ्यात आमदारकीची झालर पडली, ते विसरू नका. मोरे यांनी ‘भाजपा'वर ‘दुटप्पी खेळ' खेळण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘शिवसेना'च्या जीवावर डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायचे आणि त्याचवेळी ‘शिवसेना'च्या शिलेदारांवर वार करायचे, असा ‘शिवसेना'चा स्वभाव नाही. युती झाली नाही तर ‘भाजपा'ला ‘आडवे' करण्याची भाषा मोरे यांनी स्पष्टपणे केली आहे.

जिल्हाप्रमुख मोरे यांच्या टीकेला ‘भाजपा'चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तितक्याच सडेतोड भाषेत उत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, मोरे यांच्या वक्तव्यावरुन युती असतानाही त्यांनी बंडखोरी केली, असे स्पष्ट होते. याचा अर्थ युतीचा धर्म त्यांनी पाळला नाही. ‘भाजपा'ला वारंवार युती तोडून मागे यावे लागले. जेव्हा-जेव्हा युती केली, तेव्हा अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसले. पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) यांना थेट आव्हान देत त्यांना युती नको असेल, तर त्यांनी उघडपणे ‘डिक्लेअर' करावे. समोरासमोर लढू. युती तोडा, तेव्हा कोणाची किती ताकद आहे, ते कळेल.

पवार यांनी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावरही टीका केली. ‘युती'च्या बाजुने कोकण वसाहतीतील नागरिकांनी भोईर यांना मतदान केले. मात्र, याच नागरिकांसाठी मी उपोषणाला बसलो असताना शिवसेना आमदार भोईर बिल्डरांच्या बाजुने उभे राहिले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. या शाब्दिक युध्दामुळे केडीएमसी निवडणुकीत दोन्ही सत्ताधारी पक्ष एकत्र लढणार की, त्यांचा मार्ग वेगळा होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे