सायन-पनवेल हायवे, रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम
नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिक स्वच्छतेविषयी जागरुक असल्यामुळे नवी मुंबईचे स्वच्छतेमधील राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत राहिले आहे. त्यामुळे २९ जून रोजी डॉ. श्री.नानासाहेब धम्रााधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांचे ३५०० हून अधिक श्रीसदस्य तसेच नागरिक एकत्र येऊन सायन-पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याची बाब समाधान आणि आनंद देणारी असल्याचे गौरवोद्गार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी काढले.
नवी मुंबई महापालिका तसेच डॉ. श्री. नानासाहेब धम्रााधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांचे ३५०० हुन अधिक श्रीसदस्य यांच्या संयुवत विद्यमाने सायन-पनवेल महामार्ग तसेच बेलापूर, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या ५ रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या मोहिमेमध्ये २२ टन कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये प्लास्टिकचे तुकडे, रॅपर्स, एकल वापर प्लास्टिक, बॉटल्स, कागद, कपडा अशा प्रकारचा कचरा तसेच अस्ताव्यस्त वाढलेले गवत, वेली यांचाही हरित कचरा संकलित करण्यात आला.
उरण फाटा येथून आयुक्त शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता मोहिमेचे विभागनिहाय नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी श्रीसदस्यांच्या उत्साही लक्षणीय उपस्थिती होती. उरण फाटा येथे आयुक्त शिंदे यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ-१ उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ-२ उपायुक्त स्मिता काळे, परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे, समाजविकास विभाग उपायुक्त किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकार मार्फत ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत १ जुलैपासून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून नवी मुंबई महापालिकेने त्याची सुरुवात आधीपासूनच ‘जागतिक योग दिन'च्या कार्यक्रमातून केली असून आजचाही उपक्रम त्याच ‘अभियान'चा भाग असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
सायन-पनवेल नवी मुंबईतून जाणारा अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असून तो ‘नमुंमपा'च्या अखत्यारित नसला तरी त्याठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असल्याने महापालिका स्वतःहूनच पुढाकार घेऊन तेथे नियमितपणे स्वच्छता मोहीम आयोजित करीत असल्याचे आयुक्त शिंदे म्हणाले. त्याअनुषंगाने २९ जून रोजी सायन-पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन्स सखोल स्वच्छता मोहीमेत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ. अप्पासाहेब धम्रााधिकारी आणि डॉ. सचिनदादा धम्रााधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक जाणीवेने प्रेरित झालेल्या ३५०० हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
बेलापूर पासून नमुंमपा हद्द ते कोकण भवन सर्कल, कोकण भवन सर्कल ते उरण फाटा ब्रीज सर्कल, उरण फाटा सर्कल ते डी.वाय.पाटील कॉलेज सर्कल, शिरवणे अंडरपास ब्रीज, शिरवणे अंडरपास ब्रीज ते जुईनगर पलायओव्हर ब्रीज, जुईनगर पलायओव्हर ब्रीज ते सानपाडा ब्रीज, सानपाडा दत्तमंदीर हायवे ते सानपाडा रेल्वे स्टेशन सर्कल, सानपाडा रेल्वे स्टेशन सर्कल ते वाशी सर्कल ब्रीज, वाशी सर्कल ब्रीज ते वाशी गांव बसस्टॉप, वाशी गांव बस स्टॉप ते वाशी टोलनाका अशाप्रकारे स्वतंत्र गट करुन श्रीसदस्य नागरिक यांना क्षेत्र वाटप करुन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या ५ रेल्वे स्टेशन्स परिसर सफाईसाठीही गटनिहाय नियोजन करण्यात आले होते.