अंबरनाथ तालुक्यातील दगडखाणीला १९० कोटींचा दंड
बदलापूर : बदलापूर जवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या २ गावात इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरु होती. या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गाव उध्वस्त होण्याच्या शवयतेने गावकरी भयभीत झाले होते. अखेर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या दगडखाण मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने १९० कोटीचा दंड ठोठावला आहे.
राज्यातील दगडखाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची सदरची पहिलीच वेळ आहे. दगडखाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुध्दा दगडखाण बंद होत नव्हती. अखेर गेल्या २ वर्षांपासून वनशक्ती या सामाजिक संस्थेने यासंदर्भात गावकऱ्यांसोबत उच्च न्यायालयात एकत्र लढा दिला. त्यानंतर या दगडखाणीच्या मालकाला परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत १ लाख ३० हजार ब्रास दगडखाणीचे उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने १९० कोटी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे आता सदर दगडखाण बंद होणार असल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. कोपऱ्याची वाडी आणि चिंचोली परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सातत्याने वायू प्रदुषण, ध्वनी प्रदुषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांची जमीनही नापीक झाल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या पिण्याचे पाण्याचे झरे देखील बंद झाले होते. त्यामुळे या विरोधात ‘वनशवती'च्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या दंडावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत सक्तीने वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.