राज्य सहकारी बँकेकडून देशातील पहिलं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर स्थापन

नवी मुंबई : भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत, राज्य सहकारी बँकेने देशातील पहिलं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (C-SOC) स्थापन केलं आहे. वाशी येथील स्वतच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे ५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून हे आधुनिक आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आलं आल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. सायबर हल्ल्यांची वाढती तीव्रता आणि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संदर्भात राज्य सहकारी बँकेने उचललेलं पाऊल महत्त्वपुर्ण ठरलं आहे.

सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स केंद्राचे लोकार्पण येत्या १३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

सायबर सिक्युरिटी केंद्राची मुख्य वैशिष्ट्ये व उद्दिष्टे:

राज्य बँक व इतर सहकारी बँकांना ज्ञात व अज्ञात सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देणे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित फ्लॅटफॉर्म द्वारे सतत निरीक्षण व धोका ओळखून तत्काळ सतर्क करणे. सायबर हल्ल्यांचे प्रारंभीच निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. बँकांच्या सुरक्षेची मोजणी व धोरणात्मक मार्गदर्शन करणे. २४ बाय ७ बँकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणे व त्यांना संभाव्य धोक्याची वेळीच सूचना देण्याचे काम या सायबर सिक्युरिटी केंद्राच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे विद्याधर अनासकार म्हणाले.

सद्यस्थितीत या केंद्रामध्ये राज्य सरकारी बँकेचे ३५ तांत्रिक कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. भविष्यात सहकारी क्षेत्राच्या गरजेनुसार याची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. यासोबतच राज्य बँकेच्या सदस्य बँकांसाठी सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

राज्य सहकारी बँकेने हा प्रकल्प नफा न घेता सर्व सहकारी बँकांना व पतसंस्थांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, यामागे सहकारात सहकार हे तत्व आहे. डिजिटल बँकिंग आणि एआय युगाच्या दृष्टीने हे पाऊल संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विद्याधर अनास्कर म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया