‘ठामपा'च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती
ठाणे : ठाणे महापालिका मध्ये जवळपास ४० टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षीपासून महापालिकेतील शेकडो अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची पदे रिक्त आहेत. महापालिका दिवसेंदिवस रिकामी होत असताना रिक्त जागा भरल्या जात नसल्याने याचा मोठा परिणाम महापालिकेच्या कारभारावर होऊ लागला आहे. मात्र, लांबलेली भरती येत्या काही महिन्यात करण्यास महापालिका प्रशासनाने सुरवात केली असून १,७७३ पदे सरळसेवा पध्दतीने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर १९८२ रोजी ठाणे महापालिकेची स्थापना झाली. जवळपास ५ वर्षे प्रशासकिय कारभार पाहिल्यानंतर या महापालिकेवर लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेवर आले. त्यानंतरच्या काही वर्षात म्हणजे मुख्यतः ९० च्या दशकात महापालिकेच्या सेवेत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली. त्यावेळी जे अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले, त्यांचे निवृत्तीचे वय असल्याने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यातही जानेवारी आणि जून या महिन्यात निवृत्त होणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असते.
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. ठाणे महापालिकेत सध्या वर्ग-१ ची ११९ , वर्ग-२ ची ११२ , वर्ग-३ ची १६०१ आणि वर्ग-४ ची २,२३१ अशी एकूण ४,०६३ पदे रिक्त आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने ६८२ नवी पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली होती, तर ११ एप्रिल २०२२ रोजी अत्यावश्यक सेवेतील ८८० पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली होती. दरम्यान, २ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे महापालिकेला भरीव निधी मंजूर करण्यात आला आता. ना. एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री असताना १,७७३ पदांची भरती करण्यास जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
आर्थिक पत घसरल्याने रखडली भरती...
अत्यावश्यक सेवेतील ८८० पदे भरण्यास गेल्याच महिन्यात राज्य सरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली होती. मात्र, महापालिकेचे उत्पन्न कोव्हीड काळात मोठ्या प्रमाणात घसरले. एकूण आस्थापनेवरील खर्च ४० टक्केच्या जवळपास होऊ लागला. नवी पदे भरती करताना आस्थापना खर्च ३५ टक्केहून कमी असावा, असा नियम असल्याने मंजुरी मिळूनही ठाणे महापालिका प्रशासनात अत्यावश्यक पदांची भरती होऊ शकली नव्हती.
गट-क, ड साठी जाहिरात...
गट-क, ड ची एकूण १,७७३ पद तातडीने भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने मान्यता दिलेल्या स्वतंत्र संस्थेकडून परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी ‘ठामपा'कडून पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.