ग्रामीण भागात हळदी समारंभाला वेळेचे बंधन

भिवंडी ; भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या लग्नसराई सुरु असून या आनंदाच्या क्षणी रात्री उशिरा चालणाऱ्या हळदी समारंभावर ग्रामीण पोलीस अधिकारी आक्षेप घ्ोत आहेत. पण, रात्री उशिरा सुरु राहणाऱ्या महामार्गावरील धाब्यांवर अधिकारी कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.

भिवंडी ग्रामीण क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी आणि पडघा पोलीस ठाणे असे ३ पोलीस ठाणे येत असून या ३ पोलीस ठाण्यावर नियंत्रण करण्यासाठी अंबाडी आणि भिवंडी वडपे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. येथील ग्रामीण भागात सध्या लग्नाच्या हळदीचे कार्यक्रम गाजत असून या निमित्ताने रात्री उशिरा पर्यंत लग्नघरात आनंद साजरा केला जात आहे. असे असताना काही पोलीस अधिकारी थोडा उशिरा सुरु असलेल्या या आनंदात विरजण आणण्याचे काम करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी पोलिसांविरुध्द संताप व्यक्त केला आहे.

शहरात मोठी लोकवस्ती असते. मात्र, ग्रामीण भागात छोटी लोकसंख्या फारच कमी असल्याने सहसा कोणी नागरिक अशा रात्री-उशिरा चाललेल्या आनंदाचा क्षणी हरकत घेत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तालुक्यातील भिवंडी, गणेशपुरी आणि पडघा या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने धाबे असून ते रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. विशेष म्हणजे मुंबई-नाशिक आणि भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या वडपे गावाजवळ पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या चोहोबाजुस रात्री उशिरापर्यंत चालणारे धाबे आहेत. सदरचेे कार्यक्षेत्र भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून याबाबत नागरिकांकडून नेहमी तक्रारी केल्या जात आहेत. या धाब्यांवर हत्येची घटना घडलेली असून कधी छोटी-मोठी भांडणे देखील होत असतात. यापैकी काही ढाब्यांमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर देखील सुरु आहेत. तर लपून-छापून दारु पिण्याचे प्रकार देखील सुरु आहेत. असे असताना ग्रामस्थांच्या एक दिवसाच्या हळदी समारंभाला वेळेचे बंधन घालणाऱ्या पोलीस यंत्रणेचे उशिरापर्यंत चालणाऱ्या ढाब्यांवर कोणत्याही नियंत्रण नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांनी तक्रार केल्यावर संबंधित धाब्याच्या बाहेरील रोषणाई बंद करून आतील भागात रात्री उशीरापर्यंत धाबे सुरुच ठेवले जातात. असे अवैधपणे सुरु असलेले व्यवसाय बंद करून रात्री नियमानुसार वेळेत सर्व धाबे बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना आणि ढाब्यांना रात्री ११.३० वाजता व्यवसाय बंद करण्याच्या सख्त सूचना दिल्या आहेत. तरी देखील भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-नाशिक आणि भिवंडी नाशिक मार्गावरील धाब्याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-विलास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-भिवंडी तालुका पोलीस ठाणे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नैसर्गिक नाल्यांच्या बदलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष