भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन
उरण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी ४ सप्टेंबर रोजी जवाहरलाल नेहरु पोर्ट (जेएनपीए) येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण (पीएसए) मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२चे हैद्राबाद हाऊस नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरण मधील जेएन पोर्ट पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ येथे उपस्थित होते.
या टर्मिनल लोकार्पणामुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरु झाला असून, सदर टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त करत सदर प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या ‘अमृत काल दृष्टीकोन'ला समर्पित केले.
या टर्मिनल उद्घाटन समारंभ प्रसंगी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी-जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पराग शहा, ‘कस्टम'चे चीफ कमिशनर विनल श्रीवास्तव, ‘जेएनपीए'चे प्रमुख उन्मेश वाघ, आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र १०० वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनणार...
जेएनपीए आणि पीएसए इंडियाच्या सहकार्यामुळे सदर टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे जेएनपीए लवकरच जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळे महाराष्ट्र पुढील १०० वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल. यावेळी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल. या टर्मिनलमुळे ‘महाराष्ट्र'ने भारतातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून, जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे सदर टर्मिनल १०० टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून, समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरुप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे. या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ४.८ दशलक्ष टीईयू इतकी झाली असून, घाटाची लांबी २००० मीटरपर्यंत वाढली आहे. यामध्ये २४ घाट क्रेन आणि ७२ रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे.
या फेज-२ विस्तारामुळे ‘बीएमसीटी'ची क्षमता २.४ दशलक्ष टीईयू पासून दुप्पट होऊन ४.८ दशलक्ष टीईयू झाली आहे. सदर टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे ६३ हून अधिक इनलँड कंटेनर डेपोशी (आयसीडी) जोडले गेले असून, ते भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे. जून २०२५ पासून सदर टर्मिनल सुविधांसाठी तयार होते आणि उद्घाटनामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला नवीन आयाम मिळणार आहे.
उद्योग तज्ञांनी या टर्मिनल विस्ताराला ‘गेम-चेंजर' म्हटले आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि बहुआयामी पायाभूत सुविधांसह, पीएसए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा प्रमुख चालक बनण्यास सज्ज आहे. टर्मिनलच्या लोकार्पणानंतर भारत जागतिक समुद्री अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास पुढे सरसावला आहे.
कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तर ‘जेएनपीए'चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत प्रास्ताविक केले.