खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई प्रवेश; २४ पालकांविरुध्द गुन्हा

नवी मुंबई : खारघरमध्ये राहणाऱ्या काही पालकांनी वास्तव्याच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. काही पालकांनी तर मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करुन बनावट पुरावे देखील सादर केल्याचे आढळून आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी खोटे पत्ते आणि बनावट कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या २४ पालकांवर तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन देण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

‘महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय'च्या वतीने १३ जानेवारी रोजी विना अनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पार पडली होती. शाळेपासून १ कि.मी. अंतरात वास्तव्यास असलेल्या पाल्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशास प्राधान्य देण्यात येते. याचाच फायदा उचलत काही पालकांनी शाळेच्या १ कि.मी. अंतरामध्ये राहत नसताना, शाळेच्या १ कि.मी. अंतरात राहत असल्याचे बनावट वास्तव्याचे कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे आरटीई नुसार आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतले.  

दरम्यान, पनवेल तालुक्यातील सर्व विनाअनुदानीत बालकांचा मोफत-सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अन्वये (आरटीई अंतर्गत) प्रवेश मिळवलेल्या पाल्यांच्या पालकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्याची पडताळणी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ‘पनवेल पंचायत समिती'चे गट शिक्षण अधिकारी सिताराम मोहिते यांनी दिले होते. त्यानुसार खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल, विश्वज्योत हायस्कुल आणि विग्बोर हायस्कुल या शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्यांची पडताळणी करुन अहवाल सादर केला होता.  

सदर अहवालामध्ये २४ पालकांनी शाळेच्या १ कि.मी.च्या परिघाबाहेर राहत असून देखील, त्या परिघात राहत असल्याचे खोटे पत्तेे दाखवत आरटीई अंतर्गत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करुन घेतल्याचे आढळून आले. काही प्रकरणांमध्ये मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करुन बनावट पुरावे सादर करण्यात आल्याचेही आढळून आले. या पालकांनी खोट्या कागदपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल करुन प्रवेश मिळवल्याचे स्पष्ट झाल्याने गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात या पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

त्यानुसार पोलिसांनी खोटे पत्ते आणि वास्तव्याचे बनावट कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या २४ पालकांवर तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन देण्यास मदत करणाऱ्यांविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

५ वी, ८वी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महापालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले