वादळी हवामानामुळे सागरी प्रवासी वाहतूक बंद- प्रवाशांचे हाल
उरण: मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरात सहाव्यांदा धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. यामुळे शनिवारी पासून गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले आहेत.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यात राज्यात १६ ते २१ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान ताशी ५०-६० किमी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून, मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सलग सहा दिवस सागरी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.
खराब हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा दोन महिन्यांत पाचव्यांदा विविध बंदरांत लावला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा गेटवे जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद केल्याची माहिती गेटवे मुंबई जल वाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम यांनी दिली.
मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही शुक्रवारपासून बंद केल्याची माहिती मोरा बंदर विभागाकडून देण्यात आली. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक शुक्रवार दुपार पासूनच कोलमडली आहे. बुधवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असल्याने हवामान विभागाने हवामान सुरळीत असल्याचे सांगितल्यास गुरूवार पासून या सर्व मार्गांवरील सागरी वाहतूक सूरू होण्याची शक्यता आहे. विविध सागरी मार्गावरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली आहे.