वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल -मुख्यमंत्री

मुंबई : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, सदर प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय-बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने आयोजित ‘सागरी शिखर परिषद २०२५'चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय-बंदरे विकास मंत्री नितेश राणे, परिवहन-बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., ‘जेएनपीए'चे अध्यक्ष उन्मेश वाघ, आदि उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या ‘मेरीटाईम व्हिजन'चा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भविष्यात भारत जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारने ‘इंडिया मेरीटाईम व्हिजन-२०३०' आणि ‘अमृतकाल मेरीटाईम व्हिजन-२०४७' तयार केले आहेत. या दोन्ही व्हिजनचा अभ्यास करुन महाराष्ट्रासाठी एक मजबूत मेरीटाईम व्हिजन तयार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. या धोरणासाठी आजच्या चर्चासत्रातील सर्व शिफारशी संकलित करून आम्ही त्या अंमलात आणू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई आर्थिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि आर्थिक राजधानी आहे. मुंबईला भारताचे आर्थिक इंजिन बनवणारे मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट अशी बंदरे आहेत. सदर दोन बंदरे मुंबईला आघाडीवर घेऊन आली. आता आपण जागतिक सप्लाय चेनमध्ये शक्ती बनण्याचा संकल्प करीत आहोत. त्यामुळे बंदरांची क्षमता, कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यावर वाढवण बंदरासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न हाती घेण्यात आले. प्रारंभी प्रकल्प १०० टक्के महा पोर्टकडे होता. परंतु, त्याचा व्याप पाहता केंद्र सरकारला प्रमुख भागीदार करण्यात आले. वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये स्थान मिळवेल. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि महाराष्ट्र त्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑफशोअर विमानतळ, मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी...
भारताचे पहिले ‘ऑफशोअर विमानतळ' वाढवण बंदराशेजारी उभारले जात आहे. यामुळे जलमार्ग, रेल्वे, रस्ता आणि हवाई मार्गांची मल्टिमोडल जोडणी मिळेल. यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात जलवाहतूक, शिपबिल्डींग आणि शिप रीसायकलिंगसाठी मोठी संधी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वाढवण बंदराला जोडणारे रेल्वे जाळे तयार करण्याचाही प्रयत्न करत करण्यात येत आहे. सागरमाला प्रकल्पामुळे ही कनेक्टिव्हिटी खूपच सोपी झाली आहे. भविष्यात आपण केवळ कार्गो हाताळणीपुरते मय्राादित राहणार नाही, तर शिपबिल्डींग, शिप रीसायकलिंग, वॉटर ट्रान्सपोर्टच्या दिशेने जाऊ शकतो. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-नवी मुंबई भागात जलवाहतुकीची खूप मोठी संधी आहे. यामुळे नागरिकांचे जीवनमान खूप सुकर होऊ शकते, असे ना. फडणवीस यांनी सांगितले.

मेरीटाईम समिट शिखर संमेलन केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राला देशाच्या मेरीटाईम क्षेत्रात आघाडीच्या स्थानी नेण्यासाठी घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अरबी समुद्र केवळ आपली भौगोलिक सीमा नाही, तर ती एक संधीने भरलेली अमर्याद शक्ती आहे, असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

प्रारंभी अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी प्रास्ताविकातून राज्यातील बंदर विकासात करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा, कनेटीव्हीटी याबद्दल माहिती दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत जलाशयांची सखोल स्वच्छता