एमआयडीसी निवासीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये गेले काही दिवस घरगुती कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या गाड्या नियमित किंवा वेळेवर येत नाहीत. काही ठिकाणी तर सलग २-३ दिवस घंटागाड्या न आल्याने रहिवासी बेजार होऊन त्यांनी तो राग, रोष समाज माध्यमाद्वारे प्रकट केला. परंतु, याचा काहीही उपयोग होतांना दिसत नाही. सद्या चेन्नई पॅटर्न प्रमाणे खाजगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांच्याकडे अपुऱ्या घंटागाड्या आणि अपुरे खाजगी कर्मचारी असल्याने असे प्रकार होत आहेत.

शिवाय ओला आणि सुका कचरा पुढे एकत्रच करीत असल्याचे दिसत आहे. घरगुती कचरा नियमित उचलला जात नसल्याने काही नागरिक नाईलाजास्तव तो कचरा रस्त्याच्या कडेला पिशवीत ठेवून जात आहेत. आधीच रस्त्यावर झाडांचा पालापाचोळा आणि इतर कचरा जमा होत असताना त्यात सदर घरगुती कचरा जमा झाल्याने परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रोगराई होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने काही जागरुक नागरिकांनी त्याबाबतची तक्रार कल्याण-डोंबिवली महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे तक्रार केली असून कोकरे यांनी यात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

याच अस्वच्छतेच्या परिस्थितीची माहिती मिलापनगर मधील ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी ‘केडीएमसी'चे आयुक्त अभिनव गोयल यांना ई-मेल द्वारे देऊन तक्रार केली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर काहीजण यापुढे पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील ऑनलाईन तक्रारी करणार आहेत.

कचऱ्यासारखा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला असला तरी येथील सर्व राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यात पाहिजे तसे लक्ष घालताना दिसत नाही. त्यात ऐन दिवाळीत वीज, पाणी पुरवठा अनेकदा खंडीत होत होता. यामुळे निवासी भागातील जनता आता या प्रकाराला विटली असून एखादे प्रखर आंदोलन करण्याचा विचारात आहे.
-राजू नलावडे, सामाजिक कार्यकर्ते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात ‘नाट्यमहोत्सव'ला हाऊसफुल्ल प्रतिसाद