विमानतळाला ‘दिबां'च्या नावावर राज्य सरकारचे एकमत, केंद्र सरकारच्या घोषणेची प्रतिक्षा-संजीव नाईक

नवी मुंबई : केंद्र सरकार देशातील ५ विमानतळांच्या नामकरणाबाबत लवकरच निर्णय घ्ोणार आहे. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारने एकमताने मंजूर करुन केंद्र सरकार कडे पाठविलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव देखील आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील असेच नामकरण होईल. याबाबत कोणतीही शंका नाही, असे माजी खासदार तथा ‘नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे कार्याध्यक्ष संजीव नाईक यांनी वाशी येथे सांगितले.

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे आयोजित इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संजीव नाईक बोलतय होते.

याप्रसंगी ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे संस्थापक अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत, संजय यादव, देवेंद्र खाडे, वि्लराव यादव, शैलेश घाग, सचिन शिंदे, मनोज महाराणा तसेच बृहन्मुंबई, मुंबई आणि उरण विभागातील मच्छीमार बांधवांचे नेतृत्व भुवनेश्व धनु, विजय वरळीकर, चंद्रकांत कोळी, राकेश कोळी, प्रमोद कोळी, जयेश आक्रे, अजिंक्य पाटील, संदेश भोटेकर, आदि उपस्थित होते.

लोकनेते दि. बा. पाटील थोर नेतृत्व होते. त्यांनी ठाणे, रायगड आणि मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना सन्मान आणि त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत. विरोधी पक्षात असून देखील ‘दिबां'नी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सभागृहात नामोहरण त्यांनी केले होते. मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी कायद्यात बदल करुन, सर्वांना मदत मिळेल यासाठी वनमंत्री गणेश नाईक स्वतः याकामी जातीने लक्ष घालत आहेत. ‘अटल सेतू'मुळे मच्छीमारांचे बाधितांना नुकसान भरपाई एमएमआरडीए, वाशी खाडीपुल बाधितांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ किंवा एमएमआरडीए यापैकी एक आणि घणसोली-ऐरोली पामबीच मार्गामुळे होणाऱ्या बाधितांना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात १४ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत. त्यापैकी ३ हजार तरुणांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे. तसेच भविष्यात ५५ हजारापेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या ७ महाविद्यालयांमध्ये ‘एआय'चे शिक्षण सुरू करण्यात आले. तसेच इम्पोर्ट एक्स्पोर्ट (आयात-निर्यात) क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. सीबीडी येथे लॉजिस्टिक क्षेत्र कार्यरत व्हायला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत विविध इंटरनॅशनल आणि नॅशनल कपन्यांकडून सुमारे ५५० लाख कोटी रुपयांची ‘डेटा सेंटर'मध्ये गुंतवणूक केली जाणार असल्याने ‘डेटा सेंटर्स'मध्ये देखील नोकरी उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने तरुणांनी शिक्षण घेतले पाहिजे असे सांगत शहरातील धोकादायक इमारतीचे सेल्फ पुनर्विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे संजीव नाईक यांनी स्पष्ट केले.

लोकनेते ‘दिबां'चे सर्व आयुष्य लोकांसाठी आणि समाजासाठी समर्पित होते. त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन परतावा कायद्याच्या माध्यमातून साडेबारा टक्के योजनेतून भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले आहेत. प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात; मात्र शहरातील नागरिकांसाठी देखील त्यांच्या शहरातील नव्याने निर्माण झालेल्या गरजांसाठी आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सिडको'ची सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि पंतप्रधान आवास योजना या योजनेतील पन्नास टक्के घरे स्थानिकांसाठी राखीव ठेवली पाहिजे असे ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत म्हणाले. तर एकविसाव्या शतकात ‘दिबां'सारखे आयुष्य कोणी जगू शकत नाही. समाजाच्या कल्याणासाठी त्यांना आपले आयुष्य दिले. ‘दिबां'च्याच स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने गुणवंत विद्यार्थीचा गुणगौरव आणि ज्येष्ठांना छत्री भेट असा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला असल्याचे निशांत भगत यांनी सांगितले.

दरम्यान, सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, महाविद्यालयीन बॅग्स भेट देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिकांना छत्री भेट देण्यात आल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘संविधान'चे जतन करणे आवश्यक -आयुक्त अभिनव गोयल