मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना
गेल्या दशकभरात अनेकवेळा अभय योजना लागू करण्याची प्रशासनावर वेळ
उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने २४ फेब्रुवारी पासून १८ मार्च पर्यंत ३ टप्प्यात अभय योजना लागू केली आहे. सदर अभय योजना अंतिम असल्याचे सांगितले जाते आहे.
पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकीसह चालू कराची रक्कम एकरकमी भरल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. त्यानंतर विलंबशास्तीत ७५ टक्के तर शेवटच्या टप्प्यात ५० टक्के माफी दिली जाणार आहे. उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात भीषण झाली आहे. मालमत्ता कराची वसुली होत नसल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक वर्षे महापालिकेची थकबाकी आणि महापालिका अर्थसंकल्प यात थकबाकी वरचढ दिसत होती. लोकप्रतिनिधींनी अनेकांना दिलेले संरक्षण, थकबाकीदारांवर होत नसलेली ठोस कारवाई आणि रखडलेल्या मालमत्ता उल्हासनगर महापालिका प्रकरणांचा निपटारा होत नसल्याने थकबाकी वाढतीच आहे. त्यावर अनेकदा लोकप्रतिनिधींकडून ‘अभय योजना'चा उतारा सुचवला जातो. त्यामुळे गेल्या दशकभरात अनेकवेळा अभय योजना लागू करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
२०२१ पर्यंत महापालिका प्रशासनाने ६ वेळा अभय योजना लागू केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये सातव्यांदा अभय योजना लागू करण्यात आली. तर तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांनी २०२३ मध्ये दोनदा अभय योजना लागू केली होती. २०२४ मध्येही एकदा अभय योजना लागू करण्यात आली होती. तर आता नव्याने आयुक्तपदी विराजमान झालेल्या मनिषा आव्हाळे यांनीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार कुमार आयलानी यांच्या राजकीय दबावानंतर अभय योजना लागू केली आहे.
यंदा ३ टप्प्यांमध्ये अभय योजना राबवली जाणार आहे. २४ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान नागरिकांना या ‘अभय योजना'चा लाभ घेता येणार आहे. उल्हासनगर शहरात १ लाख ८३ हजार करपात्र मालमत्ता आहेत. मालमत्ता कर थकबाकीदारांना ३ टप्प्यात वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. महापालिका प्रशासनाने सदर अंतिम अभय योजना असल्याचे जाहीर केले आहे. थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रवकम एकरकमी भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेत किती करभरणा होते आणि अभय योजनेला थकबाकीदार कसा प्रतिसाद देतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अभय योजना टप्पाः
पहिला टप्पा - २४ फेब्रुवारी ते ६ मार्च, २०२५ थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा केल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.
दुसरा टप्पा - ७ ते १२ मार्च, २०२५ दरम्यान थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम आणि २७ टक्के शास्तीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास ७५ टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.
तिसरा टप्पा - १३ ते १८ मार्च, २०२५ रक्कम आणि ५० टक्के शास्तीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास ५० टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.