‘टीएमसी'तर्फे १०० कोटींची पाणी बील वसुली

९९२३ थकबाकीदारांना बजावल्या नोटिसा

ठाणे : ठाणे महापालिकेने (टीएमसी) पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बील वसुलीचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत यंदा १८ कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे.

त्याचबरोबर आतापर्यंत महापालिकेने ९६०३ नळ जोडण्या खंडीत केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच ५४७ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर ९९२३ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी ७६ कोटी रुपये थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम १४८ कोटी रुपये आहे. एकूण बिलांच्या रवकमेपैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले

बील न भरल्यास होणार पाणी पुरवठा खंडीत...
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करुन ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी बिल वसुली अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता, खंडीत नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
...तर कारवाई होणार

प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करु नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच पाणी बील वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपीक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बील वेळेत भरावे. तसेच थकबाकीदारांनी बील भरुन महापालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडीत करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट...
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच सदर योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषदेत नमुंमपा आयुक्त शिंदे यांचे जलव्यवस्थापन, होल्डींग पाँडचा उपयोग यावर सादरीकरण