रेल्वे रुळावर लोखंडी रुळाचा तुकडा; मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीने गत १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर-नेरुळ दरम्यानच्या रुळावर ४ फुट लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकून लोकलमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळावर पडलेला लोखंडी रुळाचा तुकडा निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली होती. मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनास आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळावर लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

जुईनगर आणि नेरुळ या दरम्यानच्या रेल्वे रुळावर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने रेल्वे रुळाचा अंदाजे ४ फुट लांबीचा लोखंडी तुकडा ट्रान्स-हार्बर डाऊन मार्गावरील रेल्वे रुळावर टाकून पलायन केले होते. सदर प्रकार ठाणे येथून नेरुळला लोकल घेऊन येत असलेल्या मोटरमनच्या लक्षात आला. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवून अचानक ब्रेक मारुन तत्काळ लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी लोखंडी रेल्वे रुळाच्या तुकड्याला लोकलची धडक बसून लोकल गाडीचा कॅटील गार्ड वाकून त्याला तडा गेला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लोकल त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्याने सदर लोकल मधील प्रवाशांना लोकलमधून पायी चालत नेरुळ रेल्वे स्थानक गाठावे लागले होते. या प्रकारामुळे ऐन सकाळच्या वेळी ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.  

सदर घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळावर टाकण्यात आलेला रेल्वे रुळाचा लोखंडी तुकडा ताब्यात घेतला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडा टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती कुणीही लागले नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी लोकलचे मोटरमन शशिकुमार यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

सुदैवाने टळली मोठी दुर्घटना...
ठाणे-नेरुळ मार्गावरील मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनास आला नसता, तसेच वेगात असलेल्या लोकलची त्याला धडक लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे लोकलची मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर थकबाकीदारांवरील कारवाईला ब्रेक